नवी दिल्ली: डोळय़ांत होणारा काचबिंदू (ग्लुकोमा) हा विकार बरा करण्यासाठी कोणताही रामबाण उपाय सध्या उपलब्ध नाही. परंतु त्याला आटोक्यात ठेवून दृष्टी वाचवण्यासाठी विविध उपाय उपलब्ध असल्याची माहिती भोपाळच्या एएसजी नेत्र रुग्णालयाच्या सल्लागार नेत्रतज्ञ डॉ. नेहा चतुर्वेदी यांनी दिली. ‘काचबिंदू’ हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नेत्रविकार आहे. जर तुमच्या डोळय़ांवर दाब, तीव्र डोकेदुखी, डोळे लाल होणे आदी त्रास होत असतील तसेच तुम्ही पाहात असलेल्या वस्तूंभोवती रंगीबेरंगी वर्तुळं दिसत असतील व तसेच तुम्हाला मळमळत असेल तर बहुदा ती काचबिंदूची लक्षणे असू शकतात. डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले, की या विकारात डोळय़ांतून मेंदूला जोडणाऱ्या चेतातंतूंचे (ऑप्टिक नव्र्ह) नुकसान होते. त्यामुळे मेंदूतील दृष्टिदान केंद्र बाधित होऊन दृष्टीवर दुष्परिणाम होतो. डोळय़ांतील अतिरिक्त दाबामुळे (इंट्राक्युलर प्रेशर) हा दोष उद्भवतो. या हळूहळू दृष्टी मंद करणाऱ्या विकाराविषयी जाणून घेऊ वाढत्या वयानुसार या विकाराची शक्यता बळावते. चाळिशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये तो होण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात चाळिशी ओलांडलेले सुमारे एक कोटी दहा लाख काचबिंदू रुग्ण आहेत. अगदी नवजात अर्भकातही कधी कधी जन्मजात काचबिंदू आढळतो. ३ ते १० वर्षांच्या मुलांत आढळणाऱ्या या विकारास ‘विकसित होणारा काचबिंदू’ (डेव्हलपमेंटल ग्लुकोमा) आणि १० ते ४० वर्षे वयोगटातील या विकारास ‘अल्पवयीन काचबिंदू’ (ज्युव्हेनाईल ग्लुकोमा) असे संबोधले जाते, अशी माहिती डॉ. चतुर्वेदी यांनी दिली. त्यांनी सांगितले, की इतर अनेक विकारांप्रमाणे काचबिंदू हा आनुवांशिक असू शकतो. मेंदूवर मोठा आघात होणे, डोळय़ांत टाकण्याच्या थेंबांच्या अथवा तोंडाद्वारे ‘स्टिरॉइड’चे वैद्यकीय सल्ल्याविना दीर्घकाळ सेवन केल्यास हा विकार होण्याचा धोका असतो. हा विकार होत असल्याची फारशी पूर्वलक्षणे दिसत नाहीत. तो हळहळू बळावतो आणि दृष्टी मंद गतीने क्षीण होत जाते. म्हणून याला ‘दृष्टी नकळत चोरणारा विकार’ असेही मानले जाते. यामुळे दृष्टीचे होणारे नुकसान भरून काढता येत नसल्याने तो बळावण्याची शक्यता असलेल्यांनी नेत्रतज्ज्ञांकडे नियमित तपासणी करावी. या तपासणीत दृष्टिज्ञान करणाऱ्या चेतातंतूंची तपासणी केली जाते. तसेच डोळय़ांतील दाब तपासला जातो. गरज पडल्यास दृष्टीसंबंधित अधिक तपासण्याही केल्या जातात. त्यात ‘व्हिज्युअल फिल्ड टेिस्टग’, बुबळांच्या जाडीची तपासणी, ऑप्टिक नव्र्हच्या स्कॅिनगद्वारे काचिबदूंचे निदान केले जाते. त्यामुळे दृष्टी किती बाधित झाली हेही समजते.