‘.. बाकी सर्व ठीक आहे’ हा लोकनाथ यशवंत यांचा चौथा कवितासंग्रह आणि या संग्रहातल्या कविता मुख्यत: भाष्यकविता आहेत. कधी त्या ‘चारोळी’प्रमाणे चमकदार सुभाषितासारखे थेट भाष्य करतात – ‘खूप लोक खूपच मूर्ख असतात, सकाळी सकाळी झाडांची सुरेख फुले तोडून वाहतात दगडी मूर्तीना’ .. तर कधी त्या रूपककथेचे रूप घेतात – ‘दोन झापच्या उंदरांनी स्व-अस्तित्त्वासाठी शारीरिक शक्तिप्रदर्शन केले आणि दोघेही रक्तबंबाळ होऊन बेहोश झाले, मांजर म्हणाली- शेवटी ते उंदीरच..!’ येथे उंदीर कोण आणि मांजर कोण हे वाचकांनी आपल्या मनाने ठरवायचे आहे. कदाचित कवितेचे ‘पॉलिटिक्स’ हे शीर्षक कवीच्या मनात कोण आहे हे सुचवीत असेल. बऱ्याचदा या कविता समाजात मान्यताप्राप्त ठरलेल्या प्रवृत्तींचा पर्दाफाश करण्यासाठी अवतरतात. मग त्यात धर्माच्या नावावर कोलाहल करणारे येतात. कुपोषितांसाठी काम करण्याच्या नावावर स्वत:चेच बॅलन्स शीट अपडेट करणाऱ्या ‘एन.जी.ओ.’ येतात. स्वत:च्या बायकोलाही पणाला लावायला न लाजणारे भ्रष्टाचारी येतात. निर्धास्तपणे पर्यावरण प्रदूषित करणारे कारखानदार येतात. बेगडी परंपरांचा पोकळ अभिमान बाळगणारे मूलतत्त्ववादी येतात. कुठल्याही इझमवर सारख्याच अधिकारवाणीने बोलणारे ‘थोर’ म्हणवले जाणारे विचारवंत येतात. असंवेदनशील अतिश्रीमंत येतात. ‘बाबा वाक्यं प्रमाणं’वर गुजराण करणारे कृतिशून्य वाचाळवीर येतात. ईश्वरासारख्या अस्तित्त्वातच नसलेल्या गोष्टीचे भांडवल करून स्वत:चे पोट भरणारे धर्मगुरू येतात. अगदी तुकाराम, नामदेव, एकनाथांसारख्या संतश्रेष्ठांना चुकीच्या गोष्टीसाठी श्रेष्ठ ठरवण्याच्या प्रवृत्तीचे भंजन करायला लोकनाथ यशवंत कचरत नाहीत. स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय नेत्यांपासून आंतरराष्ट्रीय राजकारण्यांपर्यंत सर्वच त्यांच्या रडारवर येतात. त्यांची कविता या सर्वावर आपली नजर रोखते. भाष्यकाराची भूमिका घेते. लोकनाथ यशवंतांची कविता मूलत: बहिर्लक्षी आहे. त्यांच्या कवितेचा निवेदक जेव्हा स्वत:विषयी काही सांगत असतो, तेव्हा त्याचे बोट इतरांवर रोखलेले असते. ‘बैठक’सारख्या कवितेत जेव्हा सीनिअर सिटिझन्सच्या बैठकीत शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक विषयांचा काथ्याकूट होत असताना निवेदक ‘आपण धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करू या’ असे म्हणतो तेव्हा त्याला आपण काय म्हणालो हे सांगायचे नसते, तर पुढच्या मीटिंगला त्या लोकांनी निवेदकाला बोलावलेच नाही हे सांगून लोकांना धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायचाच नसतो या प्रवृत्तीवर भाष्य करायचे असते. ‘बूमरँग’सारख्या कवितेचा निवेदक जरी अगदी आपल्या जुन्या प्रेमाबद्दल बोलू लागला, तरी तो आपल्या भावना सांगण्यापेक्षा, तेव्हा त्याचे प्रेम ठोकरणारी प्रेयसी आता कशी पश्चात्ताप करते आहे याकडेच अंगुलीनिर्देश करीत असते. लोकनाथ यशवंत ‘बेदखल’सारख्या एखाद्या कवितेत स्वत:च्या नावानिशी सामोरे येतात – ‘दु:खांना फाटय़ावर मारलं, म्हातारपणाला धीरानं घेतलं, मृत्यूचं स्वागत केलं हसत हसत, म्हणालो स्वत:शी मी लोकनाथ यशवंत झालो, बहुसंख्य म्हणाले – नाही नाही, तुम्ही बुद्ध झाले’ वर वर पाहता ते स्वत:चे जीवनतत्त्वज्ञान सांगू जात आहेत. हे तत्त्वज्ञान म्हणजेच ‘लोकनाथ यशवंत’ असे स्वत:शी म्हणत आहेत. तर ते ऐकून बहुसंख्य म्हणतात – ‘नाही, नाही, तुम्ही बुद्ध झाले’, पण हे तत्त्वज्ञान बौद्ध तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे म्हणून ते असे म्हणत नाही आहेत, तर हे बहुसंख्य लोकनाथ यशवंताचा जात-धर्म कोणता आहे एवढेच पाहतात. प्रत्यक्ष भाष्य न करता, लोकनाथ यशवंत अशा कवितांतून या प्रवृत्तींवर भाष्य करीत आहेत. लोकनाथ यशवंत यांच्या कवितांचे बलस्थान हेच आहे. ..बाकी सर्व ठीक आहे!
‘.. बाकी सर्व ठीक आहे’- लोकनाथ यशवंत,
समुद्र प्रकाशन, नागपूर,
मूल्य -१५० रुपये
हेमंत गोविंद जोगळेकर – hemantjoglekar@yahoo.co.in