पुण्यात मुठा कालवा फुटला असून त्यामुळे जनता वसाहत आणि पर्वती भागात राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याठिकाणची पाहणी करण्यासाठी आज माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी शहरातील आणि राज्यातील भाजपा सरकारवर सडकून टीका केली. भाजपच्या गलथान कारभाराचा फटका पुणेकरांना बसला असल्याचे ते म्हणाले. कालव्याची डागडुजी करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

या दुरुस्तीच्या कामासाठी केवळ २ कोटी खर्च अपेक्षित होता मात्र तरीही ती वेळेत झाली नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पिण्याचे आणि शेतीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. आता या वाया गेलेल्या पाण्यासाठी जबाबदार कोण असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. सत्ताधारी भाजपामध्ये प्रशासनाकडून कामे करून घ्यायची धमक नाही अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली. नागरिकांचे यामध्ये झालेले नुकसान भरुन देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पुण्यातील सिंहगड रोडवरील जनता वसाहत जवळून जाणारा मुठा कालवा आज सकाळी अचानक फुटल्याने लाखो लीटर पाणी रस्त्यावर वाहून आल्याची घटना घडली. या घटनेत २०० हून आधिक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळाला महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली. तेव्हा त्यांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वसन दिले. त्यानंतर काही वेळाताच अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तर यावेळी नागरिकांनी देखील पवार यांच्यासमोर आपल्या व्यथा व्यक्त केल्या आणि मदत मिळावी अशी मागणी केली.