चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक मानव-वन्यजीव संघर्ष वाढला असून वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय मारोती लिंबा नागोसे या वृध्द इसमाचा मृत्यू झाल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ९५ मध्ये घडली.

तीन दिवसातील ही दुसरी घटना असून दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. बोर्डा येथील रहिवासी मारोती लिंबा नागोसे हे बैलगाडीने कामाला जाण्यास निघाले. कामाला जात असताना वाटेत वाघाने त्यांची वाट अडवून त्यांच्यावर झडप घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल होवून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.