अनेक आरोपांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणारे भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने त्यांच्या पाठीशी जिल्ह्यात एकही भाजप आमदार वा कार्यकर्ता नसल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, सुंठी वाचून खोकला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने येथील शासकीय विश्राम भवनात गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हा भाजप अध्यक्ष राजू डांगे, माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा आणि उध्दव येरमे आदी नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची आढावा बठक सुरू असताना एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्याचे झाल्याचे वृत्त आले आणि आढावा बठकीत एकच प्रश्न चच्रेत आला. तो म्हणजे, एकनाथ खडसेंचा फक्त महसूल मंत्रीपदाचा राजीनामा आहे की, एकूणच सर्व खात्यांच्या मंत्रीपदाचा, याची ताबडतोब खातरजमा करा म्हणून कार्यकत्रे म्हणू लागले. जेव्हा सर्व खात्यांसह मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकृत केल्याचे ‘कन्फर्म’ झाले तेव्हा सर्व कार्यकर्त्यांचा जीव जणू भांडय़ात पडला आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा तयारीला उधाण आल्याचे वातावरण निर्माण झाले. एकनाथ खडसे जरी बहुजन समाजाच्या नेत्याचा आव आणत असले तरी त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील भरपाई करू शकतात, असा विश्वासही कार्यकत्रे विश्रामभवनातच व्यक्त करीत होते.
गंमत अशी की, ‘मी साधा कार्यकर्ता आहे. संधी मिळाली म्हणून राज्यमंत्री या नात्याने मला माझी कर्तव्ये करायची आहेत’ अशी विनम्र प्रतिक्रिया डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हसंराज अहिर, तसेच मुख्यमंत्र्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे गट भाजपात आहेत. मात्र, एकनाथ खडसेंचा एकही कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातून झालेल्या हकालपट्टीने कोणालाही दुख झाल्याचे दिसले नाही. जिल्ह्यात प्रथमच काँग्रेसचा पूर्ण सफाया होऊन सात पकी पाच आमदार भाजपचे आहेत. सेनेचे संजय राठोड मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे मनोहर नाईक एकमेव विरोधी आमदार आहेत. भाजपाच्या पाचही आमदारांना एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने वाईट वाटले नाही. उलट, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या स्वयंभू नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याची भावना दिसत होती.

नाथाभाऊंचे संजयासमोर ‘म्याउ’
एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा विषय ही भाजपची अंतर्गत बाब आहे, असे शिवसेनेला ठणकाविणारे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांना चपराक बसल्याची भावना शिवसेनेत असून नाथाभाऊंच्या राजीनाम्यामुळे सर्वाधिक आनंद शिवसेनेला झाला आहे. कारण असे की, शिवसेना नेते संजय राठोड यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपद आहे आणि खडसे यांनी अगदी सुरुवातीलाच संजय राठोड यांचे पंख छाटले होते. परिणामत राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची धमकी राठोड यांनी देऊन राज्यभर खळबळ निर्माण केली होती. अखेर नाथाभाऊ हे संजय राठोड यांच्या डरकाळीसमोर झुकले आणि त्यांनी राठोड यांना त्यांचे अधिकार बहाल करून ‘म्याउ’ म्हटले, हा ताजा इतिहास आठवून आता सेना कार्यकत्रे आनंदित झाल्याचे दिसत आहे.

न.मा. जोशी