माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये केली.राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न राज्यात सुरु आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत, पण त्यांना नवरीच मिळत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनला विरोध करणारीही भूमिका मांडली. पाच टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीला धरणं चुकीचं आहे. लोकांनी लॉकडाउनचे नियम तोडून आपले व्यवहार सुरळीत करावेत अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी परवाच अकोल्यात न्हाव्याकडे जाऊन केस कापून घेतले आणि लॉकडाउनला विरोध दर्शवला. लॉकडाउन असाच कायम राहिला तर करोनापेक्षा लोक उपासमारीने मरतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा सगळ्यात मोठा फटका हा कामगार आणि पारंपारिक व्यापाऱ्यांना बसला आहे त्यांना सरकारने मदत केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी आज केली.

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून केला जात आहे. त्याबाबत विचारले असता, फडणवीस हे लग्न करण्यासाठी उतावीळ झालेले आहेत, पण त्यांना नवरीच मिळेना, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. आता या टीकेला फडणवीस काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.