पुण्याच्या अभिषेक शेलार यांनी एक अनोखं मशीन तयार केलं आहे. हे पूर्णपणे ऑटोमॅटिक असं कचरा उचलण्याचं मशीन आहे. त्यांनी या मशीनला जटायू असं नावही दिलं आहे. या मशीनमुळे कचरा उचलणाऱ्या व्यक्तीला आता हाताने कचरा उचलावा लागणार नाही. संपूर्ण काम या मशीनद्वारेच होणार आहे. या मशीनबद्दल अभिषेक सांगतात, भारतामध्ये कचरा उचलणाऱ्या व्यक्तीला हातानेच कचरा उचलावा लागतो. त्यावर आपल्याकडे सध्या कोणता पर्याय उपलब्ध नाही. जटायू हे मशीन हा पर्याय ठरु शकते. दोन वर्षांच्या संशोधनानंतर हे मशीन तयार करण्यात आलं आहे. अभिषेक यांनी हार्वर्ड विद्यापीठ तसंच आयआयटी बॉम्बे इथून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. ते पुढे म्हणतात, अशी मशीन ही पाश्चात्य देशांमध्ये झाडांची गळून पडलेली पानं उचलण्यासाठी वापरली जाते. मात्र, भारतात रस्त्यावरच्या कचऱ्यामध्ये भाज्यांचे देठ, फळांची सालं, कागद, प्लास्टिक अशा सर्व प्रकारचा कचरा असतो. तो उचलण्यासाठी हा मशीनचा वापर करता येऊ शकतो. भारतामध्ये अशा मशीनचा वापर अगदी कमी प्रमाणात होत आहे. भारतातलं कचरा उचलण्याचं काम पाश्चिमात्य देशांपेक्षा अधिक किचकट आहे. जटायूमध्ये वापरलेलं तंत्रज्ञान कचरा उचलण्याची ही समस्या सोडवण्यासाठी मदत करेल. ही मशीन वजनाने हलकी असून ती छोट्या गाडीवरुनही सहज हवी तिकडे नेता येऊ शकते. ही मशीन दिवसाला दोन टनांपर्यंत कचरा जमा करु शकते. पाच वर्षांपूर्वी अभिषेक यांनी व्यावसायिक म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली आणि गेल्या दोन वर्षांपासून ते ह्या मशीनच्या निर्मितीसाठी काम करत आहेत. गेल्या तीन वर्षात अभिषेक यांच्या कंपनीने १०० यंत्रांची विक्री केली आहे. नागरी विकास मंत्रालय तसंच पंतप्रधान कार्यालयानेही त्यांच्या व्यवसायाची दखल घेतली आहे.