राज ठाकरे यांची टीका

केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे थापाडय़ांचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दररोज नवनव्या थापा मारत असतात. १९८४ ला राजीव गांधींना बहुमत मिळाले होते यानंतर तीस वर्षांनी नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले मात्र त्यांनी थापा मारण्याची मर्दुमकी दाखवत आणि सर्वसामान्यांचचं जगण असहाय्य करून देशात आणीबाणी सदृश परिस्थिती आणली आहे. नरेंद्र मोदींनी बहुमताची मिळवलेली संधी वाया घालवलेली आहे, अशी टीका महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केली. सातारा येथे आज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप मोझर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांवर टीका करत ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दररोज एक नवनवीन आकडा सांगतात. सत्यता नसतानाही ते आकडे सांगण्यात माहीर आहेत. ते रतन खत्रीकडे कामाला होते की काय असा प्रश्न मला पडतो. ते म्हणतात राज्यात ३६ हजार विहिरी बांधल्या. मला वाटते ते रस्त्यावर पडलेले खड्डेही विहिरींच्या आकडेवारीत धरत असतील. गडकरी म्हणतात तीस कोटींचा प्रकल्प उभारणार, तर मुख्यमंत्री म्हणतात ३६ हजार विहिरी बांधल्या. एका विहिरीचे पाच लाख मग ३६ हजार विहिरींचे किती ते सांगा, आहेत का पसे. असे वेगवेगळे आकडे सांगतात आणि लोक टाळ्या वाजवतात.

ऊठसूट महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांना डावलून जिकडे तिकडे गुजरातचा उदोउदो करत आम्हाला डावलण्याचे काम सुरू आहे. परदेशातील पाहुणेही गुजरातलाच नेतात.

जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपलेले असून येत्या निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ आहे. नरेंद्र मोदींना बहुमताने मिळालेली संधी त्यांनी वाया घालवली असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

मोदींचे शेवटचे ‘बजेट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले शेवटचे ‘बजेट’ आज सादर केले. नरेंद्र मोदी हे ‘नमो रुग्ण’ आहेत. माथी भडकावून जाती-पातीचे राजकारण करण्याचा एकमेव उद्योग महाराष्ट्र आणि देशात सध्या सुरू आहे. मतांसाठी पुढील काही महिन्यात देशात धार्मिक दंगली घडविल्या जातील. खोटं बोलण्यात भाजपा सरकार पटाईत आहे. राज ठाकरे कोणालाही भडकवत नसून फक्त महाराष्ट्रातील सद्य परिस्थती समोर मांडतो असेही ते म्हणाले.