राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी (१९ ऑक्टोबर) थांबला. त्यानंतर सगळ्याचं लक्ष लागलं आहे ते मतदानाकडे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. उद्या (२१ ऑक्टोबर) राज्यात मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदान कार्ड नसलं म्हणून भाग घेणं टाळू नका. तर निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेल्या इतर ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदानाचा अधिकार बजावू शकता. आपल्याकडे छायाचित्र मतदार ओळखपत्र नसेल, तर निवडणूक आयोगाने ओळखपत्र म्हणून मान्यता दिलेल्या अकरा पुराव्यांपैकी एक ओळखीचा पुरावा मतदान केंद्रावर जाताना सोबत ठेवा. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्रासह वोटर स्लिप ही मतदारांची ओळख पटविण्यासाठी स्वीकारली जात नाही. तर, मतदारांना ओळख पटविण्यासाठी स्वतःच्या छायाचित्रासह असणारे मतदार ओळखपत्र किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अकरापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे लागते. मतदानासाठी ग्राह्य ओळखपत्रे पासपोर्ट (पारपत्र), वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवून मतदान करता येऊ शकत. मतदान करताना याकडं लक्ष द्या- विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमसोबत अत्याधुनिक व्हीव्हीपॅट जोडलं असतं. व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदाराने दिलेल्या उमेदवाराला मत नोंदविले गेल्याबद्दल खात्री करून घेता येते. मतदान केल्यानंतर ज्याला मतदान केलं. त्याच चिन्हाची चिठ्ठी सात सेकंद व्हीव्हीपॅटवर दिसते. त्यानंतर ही चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये पडते. त्यामुळे आपलं मत बरोबर पडलं की नाही याचीही खात्री करून घेता येते.