अहिल्यानगर : स्वच्छ भारत मिशनच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमांतर्गत सर्व ग्रामपंचायतींची घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन सुविधांचा प्रत्यक्ष वापर, परिसर स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती व ग्रामस्थांच्या मानसिकतेत झालेल्या सकारात्मक बदलांची केंद्र शासनामार्फत तपासणी होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ही माहिती दिली. यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून सार्वजनिक सुविधांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची एक हजार गुणांच्या आधारे तपासणी होणार आहे. यातून जिल्हा व राज्याचे गुणांकन निश्चित होईल. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनास १२० गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद १०० गुण, सुविधांचा वापर २४० गुण, प्रत्यक्ष निरीक्षणासाठी ५४० गुणांच्या प्रश्नावलींचा समावेश आहे.

पाहणीदरम्यान पुढील बाबींवर भर दिला जाणार आहे

प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन, खतखड्ड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, कुटुंब भेटीद्वारे माहिती संकलन, वैयक्तिक शौचालयांचा वापर, हात धुण्याच्या सवयी, ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन कचराकुंडींचा वापर, ग्रामपंचायतीद्वारे नियमित कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थापन, मैलागाळ उपसासाठी उपलब्ध यंत्रणा व माहितीचा दर्शनी भागावर उल्लेख तसेच धार्मिकस्थळे, शाळा, अंगणवाड्या, बाजारतळ आदी ठिकाणांची स्वच्छता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामपंचायतींनी भविष्यात ही सुविधा बचतगट किंवा इतर संस्थांमार्फत शाश्वतपणे चालविण्याचे नियोजन केले असल्यास त्यालाही गुणांकनात महत्त्व दिले जाणार आहे. गावात स्वच्छता संदेश, सुजल संकल्पना व कचरा व्यवस्थापनातून महसूलनिर्मितीबाबत ग्रामस्थांना माहिती असणेही महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण पाहणीसाठी त्रयस्थ संस्था जिल्ह्यातील प्रत्येक गावाला भेट देणार असून, प्रत्येक पातळीवर संपूर्ण तयारी ठेवण्याचे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.