अहिल्यानगर : सुमारे ५२६ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या अहिल्यानगर शहराजवळील भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारने भुईकोट किल्ला विकास आराखड्यातील २५ कोटी रुपये खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातील, एकूण आराखडा तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
केंद्र सरकार पर्यटन विभागामार्फत ‘चॅलेंज बेसड् डेस्टिनेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अंतर्गत स्वदेश दर्शन २.० हा कार्यक्रम राबवत आहे. त्यामध्ये भुईकोट किल्ला पर्यटन विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एकमेव आराखडा या योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. राज्याच्या पर्यटन विभागाकडून हा आराखडा केंद्र सरकारला पाठवला गेला होता. पंधराव्या शतकाच्या अखेरीस इसवी सन १४९० मध्ये अहमदशहा याने शहराची स्थापना करताना, जवळच भुईकोट किल्ल्याची उभारणी केली.
त्यानंतर हा किल्ला सुलताना चाँदबीबी, मुघल, पेशवे, ब्रिटिश शासनाकडे हस्तांतरित झाला. स्वातंत्र्य चळवळीत १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष या राष्ट्रीय नेत्यांना शहराजवळील भुईकोट किल्ल्यात बंदीवासात ठेवण्यात आले होते. पंडित नेहरू यांनी याच किल्ल्यात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ग्रंथ लिहिला. सध्या हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. १.५ किमी परीघ, झुलता पूल, प्रवेशद्वार, वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासारखी आहे. अलीकडच्या काळात किल्ल्याच्या परिघावर जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
आराखड्यातील कामे
या आराखड्यानुसार भुईकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर रणगाड्याची प्रतिकृती, स्वातंत्र्यसैनिकांच्या बंदिस्थळाकडे जाणारा रस्ता, त्याला कठडे, माहिती केंद्र, सौर पथदिवे, विविध प्रकारचे स्टॉल, स्वच्छतागृहे, वाहनतळ, झाडीझुडपे काढणे, संकेतस्थळ तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहितीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली.