Ajit Pawar On Hindi language Compulsion : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या धोरणाला विरोध वाढताना पाहायला मिळते आहे. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या पक्षांकडून ५ जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अजित पवारांनी या मोर्चात सहभागी होण्याबद्दल तसेच सत्ताधारी पक्षांमध्ये हिंदी सक्तीवरून मतभेद असल्याच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले आहे.

अजित पवार म्हणाले की, “या संदर्भात मी सातत्याने माझी भूमिका मांडली आहे. शेवटी सगळ्या पालकांना मुलांना कुठलीतरी एखादी भाषा यावी वाटत असतं, तरीदेखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मानसाला- जरी ते काम-धंद्याच्या, नोकरीच्या निमित्ताने बाहेरून आले असतील तरी देखील- त्यांच्या मुलांना इथे आल्यानंतर, इथे शिक्षण घेत असतील तर मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे, म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा अनिवार्य केली आहे.”

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “दुसरा मुद्दा पुढं आला आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत , बऱ्याच जणांनी त्यांची भूमिका मांडली आहे. मी पण सांगितलं आहे की, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी पहिलीपासून इंग्रजी आणि मराठीचं शिक्षण घ्यावं आणि पाचवीपासून हिंदी शिकणं सुरू करावं. जो मराठीत लिहायला-वाचायला शिकतो त्याला हिंदी पण लिहिता-वाचता लगेच येतं, कारण लिपी तीच आहे. तो हिंदी पाचवीपासून शिकला तरी चालू शकतं. अर्थात याबद्दल चर्चा होईल.”

दरम्यान शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांनी ५ तारखेला जाहीर केलेल्या मोर्चात सहभागी होणार आहात का? याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, “मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे,” असं उत्तर अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी सक्तीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद?

हिंदीसक्तीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत का? या प्रश्नवार बोलताना अजित पवार म्हणाले की, “ज्या वेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन काम करत असतात, तेव्हा वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो. पण राज्याच्या, जनतेच्या हिताचं काय? तरुण पिढी म्हणजे विद्यार्थी-विद्यार्थिनी जे शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे हे पाहायचं असतात, चर्चा करायची असते. चर्चेतून नेहमी चांगला मार्ग निघतो असं माझं मत आहे,” असे अजित पवार म्हणाले.