अजित पवार यांनी गेल्या महिन्यात २ जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला मोठा गट बरोबर घेऊन ते महायुतीत सहभागी झाले. तसेच सत्तेतही सहभागी झाले. अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, त्याआधी ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते असल्यामुळे ते सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत होते. राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत होते.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत ते भाजपावर टीका करत होते. तर भाजपाकडूनही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात होतं. अशातच अजित पवारांनी बंडखोरी करण्याच्या काहीच दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु, आता ही मंडळी एकमेकांचं कौतुक करत आहेत.
दरम्यान, काही वेळापूर्वी अजित पवार यांनी प्रसारमाध्यांशी बातचित केली. यावेळी अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं, भाजपावर टीका करणारे तुम्ही आता मोदींचं कौतुक करताय, महायुतीत गेल्यावर कसं वाटतंय? त्यावर अजित पवार म्हणाले, आम्ही दोघांनी (मी आणि नरेंद्र मोदी) एकमेकांचा बांध रेटलाय का? आपण गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम पाहतोय. जागतिक स्तरावर त्यांच्यासारखा लोकप्रिय नेता दुसरा कोणी पाहायला मिळत नाही आणि हेच सत्य आहे.
हे ही वाचा >> पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर केलेल्या ७०,००० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलले अजित पवार
भाजपाबरोबर का गेलात? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मला विकास पाहिजे. विरोधी पक्षात असताना तुम्ही आंदोलनं करू शकता, मोर्चे काढू शकता, मागण्या मांडू शकता. परंतु, निर्णय घेण्याचा अधिकार राज्यकर्त्यांना असतो. मी सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तिकडे गेलो. महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेलो. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, राज्यात उद्योगधंदे यायला हवेत. अशा अनेक गोष्टींसाठी मी तिकडे गेलो.