पंढरपूर : गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. संत ज्ञानेश्वर माऊली तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि आम्ही जातो आमुच्या गावा अशी आर्त विनवणी करीत आणि वरुणराजाच्या साक्षीने सर्व संतांच्या पालख्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.

पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार तालुक्यातील गोपाळपूर येथे मानाची ह.भ.प. अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. गण गण गणात बोते आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे ४.३० वाजता गोपाळपुरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताई, सोपानदेव, एकनाथ, नामदेव महाराज अशा विविध सुमारे ३५० संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली.

हेही वाचा – “भाजपाच्या भूमिका त्यांना लखलाभ, आम्ही सत्तेसाठी एकत्र, पण…”, अमोल मिटकरींचं सूचक वक्तव्य

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्यानंतर सर्व संताच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. देवाची आणि संताची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संत देव भेटीचा सोहळा पार पडला. यानंतर सर्व संतांच्या पालख्या आणि भाविकांनी हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी आर्त विनवणी करीत परतीच्या मार्गावर रवाना झाल्या. या वेळेस वरुणराजानेदेखील हजेरी लावली.

हेही वाचा – दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र बुधवारी उपलब्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी प्रक्षाळपूजा

पंढरपूर येथील आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीमाता अहोरात्र उभे असतात. या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात. श्री विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता.७) श्रींची प्रक्षाळपूजा करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.