शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल(सोमवार) भाजपावर केलेल्या टीकेला, भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “ज्या उध्दव ठाकरेंनी आयुष्यभर वैचारिक स्वैराचार केला, त्यांना भाजपावर बोलण्याचा अधिकारच नाही.” असं शेलार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी असले, तरी महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मते मिळू शकत नाहीत, हे मोदींनाही मान्य करावे लागले आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

यावर आशिष शेलारांनी प्रसारमाध्यमांसमोर म्हटले की, “ज्या उध्दव ठाकरे यांनी आयुष्यभर वैचारिक स्वैराचार केला, अशा उद्धव ठाकरेंना भाजपावर बोलण्याचा अधिकारच नाही. आधुनिक महाराष्ट्रात किंबहुना ९० च्या दशकानंतर ज्यांच्या वैचारिक स्वैराचाराचे उदाहरण कु पद्धतीने दिले जाईल, असा राजकीय व्यवहार म्हणजे उद्धव ठाकरेंचे राजकारण होय. त्यांनी भाजपाला शिकवण्याची गरज नाही.”

याचबरोबर “मला सर्व गोष्टी मांडायच्या नाहीत, स्वत:च्या आयुष्यात, स्वत:च्या कुटुंबात, स्वत:च्या पक्षात आणि स्वत:च्या सरकारमध्ये ज्यांना सलग अपयश आलं. कुटुंबात सुद्धा एक कुटुंब टिकवण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आलं. पक्षातील नेते सोडून गेले, त्यांना एकत्र ठेवण्यात अपयश आलं. स्वत:चं सरकार टिकवण्यात, स्वत:चे मंत्री एकत्र ठेवण्यात ज्यांना अपयश आलं, त्या उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केवळ वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भाजपाला टोमणे आणि उदाहरणं देण्याची आवश्यकताच नाही.” असंही शेलारांनी यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? –

“भाजपाकडे कोणी आदर्शच नसल्याने त्यांचा वारसा हडपण्याचा डाव असून सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे हे आपलेच असल्याचा मतलबी दावा भाजप करीत आहे. हिंमत असेल, तर भाजपने मोदींच्या नावाने मते मागून निवडणुकीत उतरावे आणि मी वडील बाळासाहेबांच्या नावाने मागीन. महाराष्ट्र कोणाच्या बाजूने उभा राहील, हे एकदा आमनेसामने होऊन जाऊ दे.”, असे आव्हान ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.