Anil Parab: शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी गुरूवारी (६ मार्च) राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना छावा चित्रपटाचा विषय काढला. “छत्रपती संभाजी महाराजांवर धर्म बदलण्यासाठी अत्याचार झाले. तरी त्यांनी धर्म बदलला नाही. तसेच पक्ष बदलण्यासाठी माझाही तुरुंगात छळ झाला. तरी मी पक्ष बदलला नाही”, असे विधान त्यांनी केले होते. या विधानावर भाजपाने जोरदार आक्षेप घेत आज विधानपरिषेदेचे कामकाज रोखून धरले. अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली असल्याचा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर, नितेश राणे यांनी केला. मात्र अनिल परब यांनी माफी मागण्यास नकार तर दिलाच, त्याशिवाय भाजपाच्या आमदारांनीच आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते, असा उल्लेख केला.

अनिल परब काय म्हणाले?

भाजपाने माफी मागण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली. “छत्रपती संभाजी महाराज माझे दैवत आहेत. त्यांच्या पायावर डोके ठेवायला मला लाज वाटणार नाही. मी काल जे बोललो, त्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला नाही. जर मी बोललेलो चुकीचे असेल तर माझे विधान कामकाजातून काढून टाकावे. तसेच मला समज देण्याचा सभापतींचा अधिकार आहे. पण सत्ताधारी बाकावरील आमदार मला समज देणारे कोण?”, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.

“मी काल बोललो की, छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा छळ पक्ष बदलण्यासाठी केला. यात मी काहीच चुकीचे बोललो नाही. तरीदेखील सभापतींना वाटत असेल की, मी चुकीचे बोललो, तर ते विधान कामकाजातून काढून टाकावे”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.

अनिल परब पुढे म्हणाले, “या सभागृहातील एका सदस्याने आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याने आधी माफी मागावी. प्रशांत कोरकटकर, राहूल सोलापूरकर यांच्यावरून विषय हटविण्यासाठी माझ्याविरोधात आरोप केले जात आहेत.” यानंतर संबंधित आमदाराचे नाव सांगा, असे सांगितले गेल्यानंतर अनिल परब यांनी भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात श्रीकांत भारतीय यांनी आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही टाकली होती, असा उल्लेख अनिल परब यांनी केला. तसेच वाद उद्भवल्यानंतर त्यांनी त्यांनी माफीही मागितली आणि पोस्ट डिलीट केली, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

अनिल परब यांच्या पवित्र्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. त्यानंतर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली. तसेच कालच्या भाषणात काही चुकीची विधाने झाली असतील तर ती कामकाजातून काढून टाकावीत, अशी मागणी सभापतींकडे केली. तसेच श्रीकांत भारतीय यांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त करून तो विषय मार्गी लावला आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा उल्लेख नको, असे ते म्हणाले.