लोकसत्ता प्रतिनिधी सांगली: बिबट्याचे आश्रयस्थान बदलल्याने शिराळा, वाळवा तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये दहशत आहे. ही दहशत कमी करण्यासाठी चांदोली अभयारण्यात अन्नसुरक्षा करण्याबरोबरच बिबट्याची नसबंदी करता येईल का यावर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. वाळवा व शिराळा तालुक्यात मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला असून चांदोली अभयारण्यातील खाद्य अपुरे पडत असल्याने उसाच्या फडात बिबट्याचे आश्रय घेतला आहे. यामुळे या तालुक्यातील शेतकर्यांना शेतीच्या कामासाठी शेतात गेल्यानंतर धास्ती वाटत आहे. वारंवार या प्राण्याचे दर्शन होत असल्याने दशहत निर्माण झाली आहे. मानवी वस्तीजवळ असलेली भटकी कुत्री, गोठ्यातील पाळीव प्राणी हे बिबट्याचे भक्ष्य बनत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी वन मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीस आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. अनिल बाबर यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आणखी वाचा-सांगली: वारणा दुथडी, चांदोली धरण निम्म्यावर मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर व संख्या वाढली असून याला आळा घालण्यासाठी नसबंदीचा पर्याय पुढे आला. मात्र, यासाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी अधिक प्रमाणात पिंजरे उपलब्ध करून द्यावेत, तसेच चांदोली अभयारण्यात अन्नसुरक्षा सक्षम करण्यासाठी तृणभक्षी प्राण्यांची पैदास वाढविण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. शिराळा येथील वन विभागाचे कार्यालय कराड येथे स्थलांतर करण्यास आ. नाईक यांनी विरोध दर्शवला.जंगल क्षेत्र असल्याने एखादा हिंस्त्र प्राणी आढळला तर बचाव कार्य करण्यासाठी पथक येण्यास विलंब होउ शकतो यामुळे शिराळा येथील कार्यालय हलविण्यात येऊ नये अशी मागणी आ.नाईक यांनी केली.