पंढरपूर : हिंदी विरोधातील मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू एकत्र आल्यावर महाराष्ट्र चालवू शकतील, असे शिवसेना ठाकरेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दावा केला. पुन्हा एकदा ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आम्हाला केवळ ठाकरे बंधू यांचे एकत्रीकरण व्हावे, हीच अपेक्षा. बाकी महाविकास आघाडीबाबत काही माहिती नाही, असेही ते बोलले.
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. त्या नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील मोर्चेबाबत विचारले असता त्यांनी भाजपा आणि शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मोर्चाला घाबरले आहेत.
दोन्ही भाऊ एकत्र येवू नये म्हणून कुटील कारस्थाने रचले जात आहे. तरी देखील दोन्ही ठाकरे एकत्र येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी शिवसेनेच्या अनेक मोर्चांवर बंदी घातली होती. पण अशा बंदीला शिवसेना कधी भिक घालत नाही. बंदी घातली तर मोडून काढू, असा निर्धार खैरे यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही. तीन-चार वेळा एकत्र आले आहेत. ते प्रबोधनकार यांचे नातू तर बाळासाहेबांचे एक पुत्र तर दुसरा पुतण्या आहेत. एकत्र आल्यावर ते महाराष्ट्र चालवू शकतील. आम्हाला केवळ ठाकरे बंधू यांचे एकत्रीकरण व्हावे, हीच अपेक्षा. बाकी महाविकास आघाडीबाबत काही माहिती नाही, असेही ते बोलले. या वेळी त्यांनी शहाजीबापू आणि गुलाबराव पाटील यांची खिल्ली उडवली. ते दोघे बोगस आहेत, असे म्हणत प्रश्नाला बगल दिली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची संधी खैरे यांनी सोडली नाही.
सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे फोडाफोडी, पळवा पाळवी, खोके, भीती घालणे अशा पद्धतीचे आहे. जनता याला वैतागली आहे. त्यांचा अस्त होण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान त्यांनी केले. तर राज्यात पुन्हा ठाकरे मुख्यमंत्री होऊ देत आणि दोन्ही बंधू एकत्र येवू दे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी यांना सुगीचे दिवस येवू दे, अशी प्रार्थना केल्याचे खैरे यांनी सांगितले.