Chief Minister Devendra Fadnavis Orders State Administration: राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी तसेच सोलापूर जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून उपाययोजना कराव्यात असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि पुराने मराठवाड्याला मोठा फटका बसला असतानाच पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपासून राज्यात विशेषत: मराठवाडयात जोरदार पाऊस पडत असून नद्यांना महापुर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश फडणवीस यानंी दिले आहेत.
काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला असून, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. यामुळे मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबविण्यात आले आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे १५० मि.मी. पावसामुळे एक लाख २५ हजार क्युसेक इतका विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढविला जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. तसेच माजलगाव धरणातून ४१ हजार ७०१ क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे. तर उजनीमधून एक लाख क्युसेक इतका विसर्ग होतो आहे. त्यामुळे नदी काढच्या लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.