सांगली : राज्यात १२५ वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार असून यासाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही वसतिगृहे थ्री स्टार होतील, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मिरजेत केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह-मिरज, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह-सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात १२५ वसतिगृह उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडेतत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
आमदार डॉ. खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्यायमंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत, विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात, विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले.