संगमनेर : पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटपौर्णिमेनिमित्त आज, मंगळवारी तालुक्यातील १७१ गावे, २५८ वाड्यावस्त्यांवर महिलांच्या हस्ते २ हजार ५२५ वटवृक्षांचे रोपण व पूजन करून वृक्ष संवर्धनाचा निर्धार करण्यात आला. स्व. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान समिती व अमृत उद्योगसमूह आणि नागरिकांच्या सहभागातून ही पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनली आहे. प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली यंदा तालुक्यातील गावांमध्ये वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांनी उचलली आहे.
दंडकारण्य अभियान पथकातील निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, मंदा सोनवणे, दीप्ती सांगळे, प्रीती फटांगरे, भाग्यश्री नरवडे, बेबीताई थोरात, निशा कोकणे, लता गायकर, अनिता सोनवणे यांच्यासह स्थानिक महिलांनी वटवृक्ष पूजन केले.
महिलांचा मोठा सहभाग – तांबे
भारतीय संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमेला महत्त्व असून वड हा दीर्घायुषी वृक्ष आहे. आध्यात्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही कारणे वटपूजेसाठी आहेत. मागील दहा वर्षापासून तालुक्यातील प्रत्येक गावात महिला या दिवशी वटवृक्षाचे रोपण व पूजन करतात. तालुक्यात झाडांच्या संवर्धनाची संस्कृती वाढली आहे. प्रत्येक घराभोवताली वृक्षांसह परसबागा निर्माण झालेल्या आहेत. वृक्षसंवर्धन चळवळीत महिलांचे मोठे योगदान असून प्रत्येक महिलेने दरवर्षी किमान दोन वृक्षांचे रोपण करावे असे आवाहन दुर्गा तांबे त्यांनी केले.