सावंतवाडी: माजी शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, समृद्धी महामार्ग जसा वाढवण बंदराला जोडला गेला, त्याच धर्तीवर शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा अशी मागणी केली. ही मागणी घेऊन आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस उपस्थित होते.
केसरकर म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग थेट गोव्याला जातो. या रस्त्याला रेडी बंदर जोडल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला शक्तिपीठ महामार्गाचा मोठा फायदा होईल. महाराष्ट्रात व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल. मळगाव किंवा झाराप झिरो पॉईंट येथे हा महामार्ग जोडण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्याची त्यांची मागणी आहे, जेणेकरून नियोजित रेडी-रेवस मार्गाला देखील शक्तिपीठ महामार्ग जोडला जाईल. रेडी-रेवस महामार्ग आणि रेडी बंदर यांना शक्तिपीठ महामार्ग जोडल्यानंतर विकासाची क्रांती घडेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
शक्तिपीठ महामार्ग गेळे आंबोली परिसरातून बोगद्यातून जाणार असल्याने पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शक्तिपीठ महामार्गाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्याला व्हायला हवा म्हणून फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे समृद्धी महामार्ग वाढवन बंदर ला जोडला तसाच शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदर व रेवस महामार्गाला जोडला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
आरोग्य सेवा आणि इतर प्रश्न
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवांबद्दल बोलताना, त्यात काही त्रुटी असल्यास बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे केसरकर म्हणाले. लवकरच आरोग्य मंत्र्यांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय सेवा योग्य प्रकारे दिल्या जाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. कोकणात डॉक्टर यायला तयार नसतात, त्यामुळे कमी पगार असल्यास मायनिंग फंडातून अतिरिक्त वेतन देण्याची तरतूद करता येईल असेही त्यांनी सुचवले. लवकरच वेंगुर्ले, शिरोडा आणि दोडामार्गमध्ये डायलिसिस सेंटर उभारण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. वीज वितरण कंपनीच्या अडचणींबाबत मुख्य अभियंत्यांकडून माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
हत्ती प्रश्न आणि वन विभाग:
हत्तींच्या प्रश्नावर बोलताना, वनमंत्री गणेश नाईक आणि अधिकाऱ्यांशी कायमच चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन हे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केसरकर यांनी केला. रामानुजन यांची तात्काळ बदली करण्याची मागणी त्यांनी केली, कारण ते असल्याने हत्तींचा प्रश्न सुटणार नाही. वन्यप्राणी लोकांना त्रास देत असतानाही, रामानुजन हे कातभट्टीवाल्यांना त्रास देत आहेत आणि लोकांना त्रास होणार नाही असे नियोजन करण्याऐवजी सतत त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे केसरकर यांनी बोलताना सांगितले.