शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे घेणार की शिंदे गट या वादावर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडदा पडला आहे. शिवाजी पार्कवरील या मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री म्हणून मी कुठलाही हस्तक्षेप केला नाही. हस्तक्षेप केला असता तर शिवाजी पार्क मिळालंही असतं, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहे. दसरा मेळाव्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दसरा मेळावा : “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…” ; बावनकुळेंचं विधान! मुख्यमंत्री असल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची माझीही जबाबदारी आहे. त्यामुळे वैरभावनेने शिवाजी पार्कसाठी हट्ट धरला नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा, अशी इच्छा होती. त्यामुळेच शिंदे गटातून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची मागणी करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी बीकेसी मैदानावर पाहणी केली. याच मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी दरम्यान, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतील याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना त्याआधीच राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या सभेला टोमणे सभा म्हटलं आहे. “उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या आहेत, त्या टोमणे सभा होत्या. त्यामध्ये कधी ते महाराष्ट्राच्या हिताचं काहीच बोलले नाहीत," असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. महाराष्ट्राला क्रमांक एकवर नेण्यासाठी जे करायला हवं होतं, ते त्यांनी केलं नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.