रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी- बावनदी घाटात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर व प्रवासी वाहतुक करणारी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघात ३१ प्रवासी जखमी झाले. टँकर ने मिनी बसला मागून धडक दिल्याने बस ४० फुट खोल दरीत गेली. तसेच टँकर पलटी होवून गॅस गळती झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर (क्रमांक एन एच ०१ एन ४६२८) ने चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी मिनी बसला मागून धडक दिली. या जोरदार धडकेमुळे मिनी बस ४० फुट खोल दरीत कोसळली तर टँकर रस्त्याच्या बाजुला पलटी झाला. या अपघातामुळे टँकर मधून गॅस गळती सुरु झाल्याने परिसरात असलेल्या एका घराला व गुरांच्या चा-याला आग लागली. त्यात एक म्हैस भाजली. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झालीने घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि बचावकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत ३१ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. टँकरच्या धडकेनंतर मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस खोल दरीत कोसळली. अपघातातील जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आल्याने ही वाहतुक पाली संगमेश्वर मार्गे वळविण्यात आली. टँकरमधून सुरू असलेल्या गॅस गळतीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसर रिकामा केला. तसेच टँकर काढल्यानंतर दुपारी उशिरा महामार्गावरील वाहतुक सुरूळीत करण्यास पोलिसांना यश आले.
गॅसटँकर व मिनी बस यांच्यात झालेल्या अपघातात संकेत कृष्णकांत जागुष्टे (वय २८), विराज राजाराम सावंत (४१, सावर्डे), मंदा सुखदेव खाडे (५३, सावर्डे), स्मिता मधुकर पाटील (४८, दहिवली), उषा अमोल खुडे (३८, खेर्डी), जयश्री सूर्यकांत गावडे (५४, सावर्डे), प्रियांका दिलीप जाधव (३८, सावर्डे), नेहा संतोष मेस्त्री (४७, सावर्डे), धर्मेंद्र दत्तात्रय देरुगडे (५३, चिपळूण), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे (५३, सावर्ड), सुलक्षणा संभाजी पाटील (४०, चिपळूण), निशिकांत दीनानाथ वानरकर (५१, सावर्डे), वृषाली सुकांत यादव (५०, खेर्डी), हर्षाली हेमंत पाकळे (३६, निवळी), नीता विनायक बांद्रे (३८, गोवळकोट), मीना सुभाष घाडगे (५२, चिपळूण), सोनाली हरेश सावंत (३०, सैतवडे), कमल किशोर किशन महाडिक (३७, चिपळूण), प्रेमकुमार बबन शिवगण (४४, चिपळूण), अमोल गणेश कोतवाल (३५, सती), मनीषा संतोष कांबळे (४७, खेर्डी), मालिनी दीपक चव्हाण (४०, धारतळे), श्वेता संजय चव्हाण (४८, चिपळूण), प्रियंका जाधव (३८, सावर्डे), राजेश यादव (४७, सावर्डे), गणेश महादेव सावर्डेकर (४५, सावर्डे), सुरेंद्र दीपक सावंत (४०, चिपळूण), सचिन अशोक पोकडे (४३, सावर्डे), उदय पांडुरंग खताते (५०, चिपळूण), अरविंद अनंत सकपाळ (४६, चिपळूण), मीना विनायक सिरकर (३७, चिपळूण) हे जखमी झाले आहेत.
महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेले मिनी बस मधील प्रवासी हे रत्नागिरीत सुरु असलेल्या शिक्षक प्रशिक्षणासाठी या वडापच्या गाडीतून येत होते. गेले काही दिवस हे प्रशिक्षण सुरु आहे. झालेल्या या अपघाताची दखल शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.