मागील काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र, येत्या तीन ते चार तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.

पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील काही भागात रविवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच सोमवारी पहाटेपासून पाऊस सुरूच होता. शहरात सकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसर, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत होता. कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, अशी माहिती भारतीय हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- पाऊस मुंबई मुक्कामी; कोकण, घाट भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम, पश्चिम-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी, पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग, मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले.