Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस आहे तिथे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र ज्या ठिकाणी पावसाने दडी मारली आहे तिथे दुबार पेरणीचं संकटही आहे. अशात सोमवारपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह मुंबई, ठाणे भागात चांगला पाऊस पडतो आहे. नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरसंच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागांसह ठाणे आणि सातारा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळं आलपल्ली- भामरागड मार्ग बंद झाला आहे तर काही छोट्या नाल्यांना पूर आल्याने इतर सात छोटे मार्ग बंद. जिल्ह्यात एकूण आठ मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली भागात पाऊसाचा जोर अधिक आल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.. कोकणातही गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीला पूर आला असून ती सध्या पात्राबाहेर ओसंडून वाहते आहे. नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना प्रशासनातर्फे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस रायगड, रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्टही जारी करण्या आला आहे. ठाणे, मुंबईत जोरदार पाऊस मध्य रेल्वे उशिराने ठाणे आणि मुंबईत रात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ज्याचा परिणाम लोकलसेवेवर झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ही १० ते १५ मिनिटं उशिराने सुरु आहे.