हिंगोली : माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या जिल्हा समन्वयकाने आधार नोंदणी केंद्र मिळवून देण्याच्या नावाखाली ९८ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वायचाळपिंपरी येथील बालाजी माधव कोंघे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. या प्रकरणी समन्वयकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात वायचाळपिंपरी येथील बालाजी कोंघे यांनी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असून यामध्ये नमूद केले की, महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांनी आधार नोंदणी केंद्र मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार तारीख ४ फेब्रुवारी रोजी इमरान शेख नावाच्या व्यक्तीच्या ऑनलाइनने ५० हजार रुपये पाठवले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारीला सागर भुतडा यांच्या ‘फोन पे’वर २० हजार रुपये पाठवले व १५ हजार रुपये रोख दिले. त्यांनी ८५ हजार रुपयांची रक्कम घेतल्यानंतर एक कीट उपलब्ध करून दिले, त्यासाठी १५ हजार रुपये देखील घेतल्याचा आरोप केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु त्यानंतर काही दिवसांतच आधार नोंदणी कीट परत औंढा येथील महिला बालकल्याण विभागाला देण्याची सूचना केली. याबाबत तक्रारदाराने अधिक चौकशी केल्यानंतर सागर भुतडा यांनी दिलेले आधार कीट त्याच्या मालकीचे नसून महिला बालकल्याण विभागाच्या मालकीचे असल्याचा प्रकार समोर आला. यासाठी कुठल्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नसल्याची माहिती घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकारामुळे आपली फसवणूक झाली असून शासनामार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बालाजी कोंघे यांनी केली आहे. या प्रकारणी जिल्हा प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू केली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.