सोलापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाच्या नावाखाली जातीचे राजकारण करायचे. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे जातीच्या राजकारणाला अजिबात थारा न देता सर्वसमावेशक राजकारण करीत आहेत. त्यामुळेच गुजराती हितसंबंधातून मुंबई महानगरीचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपने शिवसेना फोडली आहे. आता जर भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे दोघेही एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे मत एमआयएम पक्षाचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

सोलापुरात एमआयएमच्या पक्ष बैठकीसाठी इम्तियाज जलील आले होते. त्यावेळी सायंकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही बंधू एकत्र येत असल्याची नुसती चर्चा सुरू झाली तर भाजपच्या तंबूत अस्वस्थता पसरली. त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. यातच भाजपचे फोडाफोडीचे राजकारण दिसून येते. भाजपच्या विरोधात राज्यातील व देशातील राजकारणाची फेरजुळवणी करावी लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकत्र येणे काळाची गरज असल्याचे जलील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आघाडीशी मैत्रीसाठी तयार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएम स्थानिक परिस्थिती पाहून राजकीय आघाडी करणार आहे. त्याचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आला आहे. ‘एमआयएम’चा महाविकास आघाडीबरोबर समझोता करण्याचा मानस आहे. कारण आतापर्यंत काँग्रेससह महाविकास आघाडीतील अन्य पक्ष एमआयएम पक्षाला भाजपचे हस्तक (बी टीम) म्हणून हिणवायचे. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीशी मैत्रीचा हात पुढे करायला तयार आहोत. मात्र पुढे काय होणार, हे नक्की सांगता येणार नाही, असेही मत त्यांनी मांडले.