वाई : सरकारी काम म्हटले, की चिरीमिरी दिल्याशिवाय होणार नाही, ही भावना आता सर्वत्र रूढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाबाहेर चक्क ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ अशा आशयाचा फलक लावत गैरमार्गाने काम करू इच्छिणाऱ्यांना एकप्रकारे चाप लावला आहे. भष्टाचार शिष्टाचार बनलेल्या सध्याच्या वातावरणात हा फलक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

सतीश बुद्धे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते साताऱ्यात नुकतेच गटविकास अधिकारी म्हणून रूजू झाले आहेत. ते येथे रूजू होताच त्यांनाही गैरप्रकाराचे अनुभव येऊ लागल्याने अखेर त्यांनी आपल्या कार्यालयाबाहेर ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ अशा आशयाचा फलक लावला. बुद्धे यांचे पद आणि त्या अंतर्गत येणारी कामे ही थेट जनतेच्या संपर्काची असल्याने येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्यांसाठी हा फलक सध्या चर्चेचा बनला आहे.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: आज मुंबईसह तुमच्या शहरात पेट्रोलचे दर किती? जाणून घ्या एका क्लिकवर

बुद्धे या पूर्वी जिल्ह्यातील जावळी तालुका पंचायत समितीत कार्यरत होते. तेथेही त्यांची कारकीर्द प्रामाणिक अशीच राहिली. एक उपक्रमशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नुकताच त्यांनी साताऱ्यात गटविकास अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. येथेही काम सुरू करताच त्यांच्या कामाची झलक कर्मचारी वर्गापासून ते येथे कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना दिसू लागली आहे. मात्र, शिस्तीचा, प्रामाणिकपणाचा कितीही आग्रह धरला तरी अनेकजण हस्तेपरहस्ते, दलालांमार्फत कामांसाठी संपर्क साधत राहतात. यातूनच गैरकामे करण्यासाठी कधी संबंध तर कधी दबाव निर्माण करणेही सुरू होते. या साऱ्याला अटकाव घालण्यासाठी बुद्धे यांनी थेट आपल्या कार्यालयाबाहेर आपली भूमिका मांडणारा ‘मी माझ्या पगारात समाधानी आहे’ असा फलक लावला. सध्या हा फलक पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. यातून अन्य सरकारी कर्मचाऱ्यांवरही अप्रत्यक्ष वचक निर्माण झाला आहे. तर गैरकामे करू इच्छिणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत. येथे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून बुद्धे यांच्या या पारदर्शक वृत्तीचे कौतुक होत आहे.

हेही वाचा : Video: सदावर्तेंच्या वाहनांच्या तोडफोडीवर मनोज जरांगेंनी मांडली भूमिका; म्हणाले, “मराठा समाज…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कार्यालयात माझ्या नावाखाली कोणीही कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करू नये, यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. लोकसेवक म्हणून नोकरी करताना शासनाकडून मिळणारा पगार मला पुरेसा असून, अधिक माया जमविण्याची माझी इच्छा नाही. कार्यालयात काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवण्याची गरज नाही, जे योग्य काम आहे ते मार्गी लागणारच याची सातारकरांनी खात्री बाळगावी”, असे सतीश बुद्धे (गटविकास अधिकारी, सातारा) यांनी म्हटले आहे.