सातारा : महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर ते तापोळा रस्ता खचल्याने सोळशी विभागातील १५ गावांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. यामुळे शेकडो पर्यटक तापोळ्यातच अडकले आहेत. दरम्यान, या पावसाने महाबळेश्वर तालुक्यातील ओढे, नाले, कोयना नदी तुडुंब भरून वाहत आहेत. महाबळेश्वर तालुक्यात गेल्या २४ तासांत १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

महाबळेश्वर, वाई, पाचगणी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्रीपासून या पावसाला मोठा जोर आला. रात्रभर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगर उतारावरून पाण्याचे लोट सखल भागाकडे वाहत आले. यामुळे अनेक ठिकाणी डोंगरात भूस्खलनाच्या घटना घडल्या. तसेच अनेक रस्त्यांवर दरडी कोसळण्याचेही प्रकार घडले. महाबळेश्वर आणि तापोळा या दोन्ही पर्यटनस्थळांना जोडणारा वीस मीटरहून अधिक अंतराचा रस्ता या पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामुळे या परिसरातील १५ गावांचा संपर्कही तुटला आहे. तसेच तापोळा परिसरात गेलेले शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. संपूर्ण रस्ताच वाहून गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र, सतत मुसळधार पावसाचा या कामात अडथळा येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी सांगितले.

दरम्यान, महाबळेश्वरकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर छोट्या मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. प्रशासनाने जेसीबी सारखी यंत्रणेच्या मदतीने रस्त्यावर आलेला राडारोडा, दगड हलवण्याचे काम सुरू केले आहे. या घटनांमुळे महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरातील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झालेली आहे. महाबळेश्वर तालुक्यात गेल्या २४ तासांत १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात १ ते १८ जून या कालावधीत ४६५. ६ मि.मी. (१८.३३ इंच) पावसाची नोंद झाली आहे. यातील मोठा पाऊस गेल्या २४ तासांत कोसळला आहे.

दरम्यान, सातारा शहर आणि जिल्ह्यातही कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. सातारा शहर, तालुका, पाटण, मेढा, जावली भागात पावसाचा जोर अधिक आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटकांना खबरदारीचे आवाहन

दरम्यान महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने या भागात फिरताना पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नदी, नाले, ओढ्यांना पूर आलेले आहे. तेथील वाहत्या पाण्यात उतरू नये, धबधब्याखाली थांबू नये, घाटवाटा, डोंगरात दरडी कोसळण्याचा धोका आहे, कड्यावरील जमीन घसरडी झालेली असल्याने तिथे छायाचित्र काढण्यासाठी पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.