Maharashtra Political Crisis News in Marathi, 25 August 2022: शिवसेनेतील फूट आणि सत्तासंघर्षांचे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठापुढे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतला. घटनापीठाची स्थापना तातडीने करण्यात येणार असून, या याचिकांवर गुरुवारी (२५ ऑगस्ट) सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यसूचीत आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण लिस्ट नाही. त्यामुळे आज यावर सुनावणी होणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. त्याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. बुधवारी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधीमंडळात याचे पडसाद उमठण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी उधळून लावला आहे. भूसुरुंग स्फोटामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याला याआधीही नियंत्रण रेषा पार केल्यामुळे अटक करण्यात आली होती. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या कर्नलने त्याला ३० हजार रुपये (पाकिस्तानी चलन) दिले होते, अशीही माहिती मिळाली आहे.