Maharashtra Breaking News Updates, 25 May : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. मंगळवारी नव्या रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला. मुंबईत मंगळवारी २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३० पर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरही करोनासंदर्भातील आकडेवारी वाढतानाचं चित्र दिसत आहे. एकीकडे करोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढतंय की काय अशी शंका असतानाच मंकीपॉक्सने युरोपीयन देशांमध्ये दहशत निर्माण केलीय.
राजकीय वर्तुळामध्ये सध्या छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. संभाजीराजांचे अद्याप तळयात -मळयात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले असून यावरुन आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ एसटी बस आणि पीकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झालेत.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे पाणवठ्यावर पोहण्यास गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना बुधवारी घडली. यापैकी एका मुलीला वाचविण्यात यश आले असले, तरी एका मुलीचा बुडून मृत्यू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) उल्लेख करत जोरदार हल्ला चढवला. संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी जातीनिहाय जनगणनेला विरोध करताना त्यामुळे देशात अस्वस्थता निर्माण होईल असं म्हणतात. मात्र, सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होतं का? असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
वंदे मातरम् या गीताला भारतीय राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून वकील आणि भाजपा नेते आहेत. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
अफगाणीस्तानमध्ये दूरचित्रवाहिन्यांवरील महिला वृत्तनिवेदिकांना प्रक्षेपणादरम्यान चेहऱ्या झाकण्यास अनिवार्य केल्यानंतर जगभरात तालिबान सरकारवर टीका केली जात आहे. या आदेशाची काही वृत्तवाहिन्यांनी अंमलबजावणी सुरु केली आहे. तर काही वृत्तनिवेदिकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लीक करा
संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरंच आम्ही त्यांना राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ, असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता. त्यानंतर आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितलंय. बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लीक करा
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिनी नागरिकांच्या व्हिसाप्रकरणी ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणी सीबीआयने कार्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
"आरक्षण संपवणे हेच भाजपा व त्यांची मातृसंस्था आरएसएसचा अजेंडा असून मंत्रालयावरील भाजपाचा मोर्चा म्हणजे केवळ ‘नौटंकी’ आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजपा नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा," असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
दक्षिण आफ्रिकेत या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि अमेरिकेत देखील काही प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर त्यासंदर्भात भारतात देखील काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकतंच करोनाच्या धक्क्यातून हळूहळू सावरू पाहणाऱ्या जगाला मंकीपॉक्समुळे काहीशी चिंता सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर त्याचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. जमीर अहमद खान असं या आमदाराचं नाव आहे. जमीर खान यांनी भेदाभेद संपवण्यासाठी आणि समाजात सुरु असलेला धर्मवाद, जातीवादाविरोधात आवाज उठवण्यासाठी केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईसह १४ महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भाजपाने आक्रमक होत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. पादचाऱ्यांना या भागातून येजा करणे शक्य होत नाही. अशा आशयाचे वृत्त बुधवारी ‘लोकसत्ता’च्या ठाणे सहदैनिकाने प्रसिद्ध करताच, आज सकाळीच फ आणि ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविली. रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसत नसल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
आई-वडील घरी दररोज जेवण बनविण्यास सांगतात हा राग डोक्यात ठेऊन काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेली उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलगी ठाण्यात सापडली आहे. जौनपूर जिल्ह्यात राहणारी निकिता मिश्रा ही १७ वर्षीय मुलगी ठाणे पोलिसांना तलावपाळी परिसरात आढळून आली. ठाणे पोलिसांनी जौनपूर पोलिसांच्या मदतीने निकिताच्या घरच्यांशी संपर्क साधत त्यांच्या समंतीने तिला मुंब्रा येथे राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या भिक्षेकरी शोध मोहिमेच्या दरम्यान हा प्रकार समोर आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळेला मंगळवारी सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २०२० मध्ये बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने पूर्वी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याच प्रकरणामध्ये मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सुनावणीनंतर ठाण्यामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी केतकीला आणलं असता तिने प्रसारमाध्यमांनी मोजक्या शब्दांमध्ये संवाद साधला. येथे वाचा सविस्तर वृत्त केतकी नेमकं काय म्हणाली...
मुंबई इंडियन्सच्या संघाचा मुख्य मार्गदर्शक असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर हा आयपीएलच्या मागील पर्वापासून संघासोबत आहे. यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये मुंबईने ३० लाख रुपयांना अर्जूनला विकत घेतलं. मात्र दोन्ही पर्वांमध्ये अर्जूनला प्रत्यक्षात एकाही सामन्यामध्ये संघात स्थान देण्यात आलं नाही. याचसंदर्भात आता सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त
नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करून भीती व दशहत पसरवण्याचे काम करीत असतानाच आज बुधवारी १२ लाखाचे बक्षीस असलेल्या माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले. टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगिरी मानली जात आहे.
महानगरपालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, अशी ग्वाही सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मंगळवारी दिली. मात्र मुंबईसह १४ महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केेल्याने राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भाजपाने आक्रमक होत मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार असल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी आज सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळय़ात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेने संभाजीराजेंना डावलल्यानंतर मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसंच शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मुंबईमध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आलेली आहे. १५ दिवसांमध्ये नियमांचे पालन न केल्यास पोलीस सक्तीची कारवाई करणार आहेत. वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना आता वाहतूक पोलिसांनी इशारा दिला आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे सक्तीचे होणार आहे. वाचा सविस्तर...
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संभाजीराजेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ऐनवेळी कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अपेक्षाभंग झाल्याची भावना संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जबाबदार धऱलं आहे. यावरुन अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना संताप व्यक्त केला असून महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत असं सुनावलं आहे.
राज्यातील वाढती जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर ब्राह्मणविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावारुनही शरद पवारांनी भाष्य केले होते. याबाबत बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आटपाडी शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते. वाचा सविस्तर...
अंबरनाथ तालुक्यात कुशिवली धरण उभारणीच्या प्रक्रियेत बनावट दस्तऐवज सादर करून भूसंपादन मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी मंगळवारी तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात तब्बल ६० लाख रूपयांचा मोबदला लाटण्यात आला आहे. याप्रकरणानंतर भूसंपादन मोबदला अपहाराची रक्कम एक कोटी २३ लाख रूपयांवर पोहोचली आहे. उपविभागीय कार्यालयाने केलेल्या तपासणीत आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आले असून यात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
सक्तवसुली संचालनालयाने आज शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. परदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणाच्या आरोपामध्ये जाधव यांना समन्स पाठवण्यात आल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. याचा पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. येथे वाचा सविस्तर बातमी
राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विषय आधी सुरू केला होता, असं फडणवीस म्हणाले. “आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळंच काहीतरी झालं आहे. कदाचित त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
अंबरनाथच्या आनंदनगर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कंपनीला बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागली. रितीक केम असे या कंपनीचे नाव आहे. याची माहिती मिळतात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरूवात केली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रासायनिक कंपनीत सॉल्व्हंटवर प्रक्रिया केली जात होती.
राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो मंगळवारी सोशल नेटवर्किंगवर शेअर केले. या फोटोंच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला होता. आता याच प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मनसेनं पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त
सांगली महिला वनपरिक्षेत्र अधिकारी विनयभंग प्रकरणातील उपवनसंरक्षक विनय माने यांची उपवनसंरक्षक (कार्यआयोजना) या पदावर बदली करण्यात आली आहे. मात्र, या बदलीमागे राज्य शासनाने प्रशासकीय कारण दिले आहे. माने यांची बदली नको तर निलंबन हवे, अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून केली जात आहे.
चंद्रपूरमध्ये एका २० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बायपास मार्गावरील अस्टभुजा प्रभागात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धर्मवीर अशोक यादव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी त्यावरुन सुरु असलेला वाद आणि वक्तव्यं अद्यापही सुरुच आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह अद्यापही माफी मागितल्याशिवाय प्रवेश देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. बृजभूषण सिंह यांच्या विरोधावरुन महाराष्ट्रात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असताना आता भाजपाचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनीदेखील राज ठाकरेंना विरोध केला आहे. राज ठाकरेंनी अयोध्यावासियांची माफी मागावी असं ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.