मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी मुंबईत येणार आहेत. परंतु, मराठ्यांचा हा विराट मोर्चा मुंबईत धडकू नये म्हणून सरकारपातळीवर अनेक प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार झाल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळात बच्चू कडू यांचाही समावेश आहे. ते आज हा मसुदा मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. याबाबत बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

बच्चू कडू म्हणाले, मराठ्यांच्या महाराष्ट्रात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी ३०-३५ लाख नोंदी मराठवाड्यातील आहेत. सापडलेल्या नोंदीपैकी त्यांच्या सगे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देता यावं याकरता अधिसूचना काढण्यात येणार आहे. एका एका शब्दासाठी मुख्यमंत्री, सचिव यांनी चार ते पाच तास बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये मसुदा तयार करण्यात आला असून, हा मसुदा जरांगेंना दाखवण्यात येणार आहे. याबाबत त्यांची काय भूमिका जाणून घेतली जाणार आहे. तसंच जास्तीत जास्त लोकांना प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा >> नागपूर: महसूल कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाचे कारण काय?

“नोंदी सापडलेल्यांच्या वंशावळी शोधण्यासाठी एक टीम तयारी करावी लागणार आहे. स्वातंत्र्याप्राप्तीनंतर वंशावळ शोधलेच गेले नाहीत. कोतवाल बुक आणि जन्म-मृत्यू नोंदी मराठवाड्यात सापडत नाहीत. या नोंदींबाबत गहाळ झाले, उपलब्ध नाहीत अशी कारणे दिली जातात. परंतु, जरागेंच्या आंदोलनाचं यश आहे. एका-एका जिल्ह्यात ३०-३५ लाख कागदपत्रांची छाननी केली आहे, याची माहिती जरांगेंना देणार आहोत”, असंही बच्चू कडू म्हणाले.

३३-३४ नमुन्यासाठी अधिसूचना काढणार

नोंदीनुसार, कुणबींचा आकडा वाढत जात आहे. ३३-३४ च्या नमुन्यांवरूनही नोंदी शोधल्या जात आहेत. ही कागदपत्रे जीर्ण झालेली आहेत. ती काळजीपूर्वक हाताळली जातात. पुरावा म्हणून ३३-३४ चा नमुना पाहण्यासाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे, असं कडू म्हणाले. तसंच, मनोज जरांगेंचं आंदोलन आधी व्हायला पाहिजे होतं, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहपुरावेही तपासणार

३३-३४ चा नमुना, गावस्तरावर उपलब्ध असलेली माहिती, लसीकरणाची माहितींसह इतर अनेक पुरावे सहपुरावे म्हणून वापरले जावेत अशी सूचना निघणार आहे, असंही ते म्हणाले.