मतांच्या राजकारणासाठी काहीजण भूमिपूत्रांच्या हक्कांची संकल्पना मांडतात. मात्र, ही संकल्पना देशविरोधी असल्याने ती चिरडून टाका, असे स्पष्ट मत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी सोमवारी व्यक्त केले. भिवंडीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना काटजू यांनी भूमिपूत्र संकल्पनेच्या साह्याने राजकारण करणाऱयांवर कठोर शब्दांत टीका केली.
भारतीय राज्यघटनेत देशातील कोणत्याही नागरिकाला कोठेही राहण्याचा अधिकार दिला आहे, असे सांगून काटजू म्हणाले, उत्तर प्रदेशातील नागरिक महाराष्ट्रात येऊन राहू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकं उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये जाऊन राहू शकतात. अशावेळी भूमिपूत्रांचे हक्कांसाठी लढणे, म्हणजे मूर्खपणा आहे. मराठी लोकंसुद्ध महाराष्ट्रातील मूळ निवासी नाहीत. ते सुद्ध बाहेरून येऊन येथे स्थायिक झाले आहेत. अशावेळी पोट भरण्यासाठी येथे येऊन राहिलेल्या उत्तर भारतातील लोकांच्या टॅक्सी फोडणे, त्यांच्या व्यवसायाचे नुकसान करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशातील ९० टक्के लोकं मूर्ख
भारतातील ९० टक्के जनता मूर्ख आहे, तर पाकिस्तानात हे प्रमाण ९५ टक्के असल्याचे काटजू यांनी आपल्या भाषणात नमूद केले. ब्रिटिशांनी स्वार्थासाठी धर्माच्या नावावर स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती केली. भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे तिन्ही देश पुन्हा एकत्र आले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.