MNS Chief Raj Thackeray on hindi language compulsion in school : राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतली. राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याकडे सरकारची भूमिका मांडली. मात्र ही भेट झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपण सरकारची भूमिका पूर्णपणे फेटाळली असल्याचे स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ६ जुलै रोजी आपण मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा देखील केली आहे. गिरगाव ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे.

थोड्यावेळापूर्वीच राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट टाकत मोर्चा ६ जुलै ऐवजी ५ जुलै रोजी निघेल, असे सांगितले आहे.

“महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता माझ्याकडे येऊन गेले. त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ती मान्य नाही असं सांगितलं,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

दादा भुसे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबाबत पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “…त्यांनी हेही मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टीचा समावेश नाही. त्यांनी ती राज्यावरती टाकलेली गोष्ट आहे. हे राज्याकडे सोपवलेलं असताना ते हे का करत आहेत? हे अजून अनाकलनीय आहे. मी त्यांना हेही सांगितलं की, सीबीएससी शाळा ज्या नव्याने आल्या, त्या आयएएस अधिकार्‍यांच्या मुलांसाठी काढण्यात आल्या होत्या. आता त्या शाळांचे वर्चस्व राज्यांच्या शाळांवरती करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रातला आणि आयएएस अधिकाऱ्यांचा तो अजेंडा आहे. महाराष्ट्र हे का आणि कशासाठी करण्याचा प्रयत्न करतोय, जे बाकीची राज्य करण्याचा प्रयत्न देखील करत नाहीयेत? काही गोष्टींची त्यांच्याकडे उत्तरे नव्हती आणि ते ते त्याच-त्याच गोष्टी बोलत होते.”

५ जुलै रोजी मोर्चा

“या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार. हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून, मी सर्व पक्षांना मी आवाहन करतोय, येत्या ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा मराठी माणसाचा असेल, त्या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल,” अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली.

“आम्ही शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, साहित्यिक आणि इतर सर्वांशी आम्ही बोलणार आहोत, त्यांना माझं पत्र जाणार आहे. सर्वांना आम्ही बोलवत आहोत, सर्व पालक, सर्व विद्यार्थ्यांना आम्ही निमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे ते… ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल”, अशी माहिती देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिली. विद्यार्थी आणि पालकांना यायला जमेल म्हणून मोर्चासाठी रविवारचा दिवस निवडल्याचेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच इतर राजकीय पक्षांची देखील आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठीपण घालवण्याचा कट

“हा जो कट आहे- याला मी कटच म्हणेन, महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे, हा उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे. इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी महाराष्ट्रातील मराठी बांधवानी या मोर्चात सहभागी व्हावं. सर्व विरोध दर्शवत आहेत. मला अशावेळी हेही बघायचंय की राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण-कोण मोर्चात सहभागी होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.