“महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्याने आघाडीशी संबंध संपला असल्याने, १२ आमदारांच्या यादीतून माझे नाव वगळण्यात यावे.” असे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेकडे सादर केले.

यावेळी शेट्टी म्हणाले, “बारा आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी भाजपा यांच्यामध्ये झालेले आरोप, प्रत्यारोप, कुटील व गलिच्छ राजकारण यामुळे महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणजे चेष्ठा व टिंगल टवाळीचा विषय झालेला आहे.”

तसेच, “मी क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सहकार आणि कृषी क्षेत्रातील अनेक धोरणाबद्दल माझ्यासहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सरकार स्थापनेपासून घटक पक्षांना विश्वासात न घेता राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी जाणीवपुर्वक शेती, सहकार या क्षेत्रात चुकीचे धोरणे राबविले जात आहेत. यामुळे या सरकारच्या शिफारशीवरून विधानपरिषद सदस्यत्व स्वीकारणे मला नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटते. त्यामुळे बारा सदस्यांना नियुक्त करण्याचा निर्णय होईल तेव्हा यादीतून माझे नाव वगळण्यात यावे असे लेखी पत्राद्वारे त्यांना कळवले आहे.” असं राजू शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, रविकांत तुपकर, बापूसाहेब कारंडे , सुरेंद्र पंढरपूरे , दिनेश ललवानी, सचिन कड, आकाश दौंडकर यांचेसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.