सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असतानापासून अनेक वर्षे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले, स्थानिक वयोवृद्ध ज्येष्ठ नेते बळीराम ऊर्फ काका साठे यांना पदमुक्त करून त्यांच्या जागेवर पंढरपूरचे वसंत देशमुख यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे काका साठे संतप्त झाले असून, त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर रोष प्रकट केला आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा विश्वासात न घेता आपणांस तडकाफडकी जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यात आले, हा माझ्यासारखा शरदनिष्ठ कार्यकर्त्यावर मोठा अन्याय आहे, अशी भावना साठे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.उत्तर सोलापूर तालुक्यातील बळीराम साठे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी पूर्वीपासून शरद पवार यांना साथ दिली आहे.

ते आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, की अनेक वर्षांपासून पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना काहीही अडचण नव्हती. परंतु, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धैर्यशील मोहिते-पाटील हे भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आले. त्यांना पक्षात आणण्यासाठी आपले प्रयत्न होते. माढा लोकसभा निवडणुकीत ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. तोपर्यंत सारे काही ठीक होते. परंतु, नंतर त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या अधिकारावर अतिक्रमण केले. आपणांस कमी लेखण्याचा प्रयत्न करू लागले. यातून आपला स्वाभिमान दुखावला. याबाबत आपण शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले.

जिल्हाध्यक्षपद काढून आपणांस प्रदेश उपाध्यक्षपद दिले असले तरीही यात आपला अपमान झाल्याची भावना साठे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात उत्तर सोलापूर तालुक्यातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. पुढील भूमिका ठरविण्याचे सर्वाधिकार कार्यकर्त्यांनी आपणांस सोपविले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. परंतु, अंतिम भूमिका ठरलेली नाही, असेही साठे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साठेंचा नेहमीच सन्मान

दरम्यान, यासंदर्भात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी काका साठे यांचा मी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल गैरसमज झाल्याचे सांगितले. आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान केला आहे.