अलिबाग तालुक्यातील तीन कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकल्याच्या वृत्ताची दखल घेऊन गावकीच्या पंचाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वाचे लक्ष राहणार आहे.
राजकीय वादातून थेरोंडा बाजारपेठ परिसरातील धनंजय एकनाथ कोंडे, संतोष एकनाथ कोंडे आणि अंगद अशोक पाटील या तिघांच्या कुटुंबांना गावकीच्या पंचायतीने वाळीत टाकले आहे. त्यांच्या सोबत संबंध ठेवणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामाजिक बहिष्काराविरोधात प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर रेवदंडा पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात सामाजिक बहिष्काराचा निर्णय घेणारे पंच शरद रामचंद्र पाटील, नरेंद्र पांडुरंग कोंडे, उमेश रामचंद्र कोंडे, नंदकुमार नारायण नंदन, हेमंत जगन्नाथ चायनाख यांच्यासह वाळीत टाकल्याचा संदेश देणारे दत्तात्रय मेस्त्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात कारवाई होण्याबाबत मात्र साशंकता आहे. कारण काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलीस ठाण्यातच सुडकोली गावातील सामाजिक बहिष्कारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र पंधरा दिवस उलटूनही कोणालाही अटक झालेली नाही.