जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुका

नगर : जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या १० महापालिकांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडी करण्याबाबत संभ्रमावस्था असल्याचे स्पष्ट झाले. काही तालुक्यांनी महाविकास आघाडी करण्यास मान्यता दिली, तर काहींनी विरोध दर्शवला. काही तालुक्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद नसल्याने त्यांना कमी जागा द्याव्यात, अशीही मागणी केली. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार व तालुकाध्यक्षांनी स्थानिक पातळीवर हा प्रश्न चर्चा करून सोडवावा, अशी सूचना केली. जिल्ह्यात लवकरच संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, शिर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या दहा पालिकांच्या निवडणुका होत आहेत. याबाबत तालुकाध्यक्षांची मते जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीने पालकमंत्री मुश्रीफ, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी नगरमध्ये बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी आपली मते व्यक्त केली. प्रारंभी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला.

कोपरगाव, शिर्डी व राहता येथील निवडणुकांत भाजपविरुद्ध एकास एक लढत होण्यासाठी महाविकास आघाडी आवश्यक असल्याचे शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. अविनाश आदिक यांनी श्रीरामपूरमध्ये मागील वेळी राष्ट्रवादीने भाजपबरोबर आघाडी केली होती, मात्र यंदा होणार नाही, महाविकास आघाडी करायला हरकत नाही, परंतु प्रदेश पातळीवरून ज्या सूचना येतील त्याचे अंमलबजावणी करू, असे सांगितले.

अजित कदम यांनी देवळाली प्रवरामध्ये शिवसेना नगण्य असल्याने केवळ काँग्रेससमवेत आघाडी करावी असे मत मांडले. शिवशंकर राजळे यांनी पाथर्डीत आघाडी केली तरी चालेल आणि स्वबळावरही लढायला तयार आहोत, असे स्पष्ट केले. मधुकर राळेभात यांनी जामखेडचा निर्णय आमदार रोहित पवार घेतील मात्र काँग्रेस व शिवसेनेबरोबर आघाडी करताना त्यांच्याशी छोटीशीच युतीह्ण करावी अशी सूचना केली. शेवगावमध्ये महाविकास आघाडी करण्यास सभापती क्षितिज घुले यांनी विरोध केला, त्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली. राहुरीतही मिच्छद्र सोनवणे यांनी आघाडी नको, राष्ट्रवादीने स्वतंत्र लढावे अशी मागणी केली.

काँग्रेस व शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप

 राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेस व शिवसेनेच्या मंत्र्यांवर थेट आरोप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, महाविकास आघाडीत ‘संगमनेर’ अवघड दुखणे झाले आहे. तेथे राज्याचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीला सांभाळून घेत नाहीत. त्यामुळे न्याय मिळाला नाही तर तेथे ताकदीने लढावे लागेल. विधान परिषदेची जागा टिकवायची असेल, तर जिल्ह्यातील नेत्यांनी एकसंध ठेवण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घ्यावी. पाथर्डीत शिवसेनेचे मंत्री भाजपला मदत करत असल्याचा आरोपही शिवशंकर राजळे यांनी केला. 

विकास कामांमुळे मते मिळतातच असे नाही – मुश्रीफ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीचे जिल्ह्यात ६ आमदार आहेत, मात्र बैठकीला केवळ आ. आशुतोष काळे उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, विकास कामांमुळे मते मिळतात असे आपले अजिबात मत नाही. मते वैयक्तिक संपर्कावर व वैयक्तिक कामे मार्गी लावली तरच मिळतात. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पालिका निवडणुका पावसाळय़ापूर्वी होतील, ज्यांची प्रथम मुदत संपली त्या प्रथम घ्याव्यात, असा राज्य निवडणूक आयोगाकडे सरकारने आग्रह धरला आहे. पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी सभेला युवक व महिला पदाधिकारी अत्यल्प संख्येने उपस्थित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महत्त्वाची बैठक असूनही उपस्थिती कमी का? इच्छुकांना तिकिटे नको आहेत का? किमान इच्छुकांनी तरी उपस्थित राहण्याची आवश्यकता होती. जेथे शक्य तेथे आघाडी करा, इतर ठिकाणी स्वबळावर लढा. मात्र शक्यतो महाविकास आघाडी करा, अन्यथा त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होतो. परंतु आघाडी करताना बहुमतात राहू याची काळजी घ्या.