विजय पाटील

कराड : पश्चिम घाटक्षेत्रात यंदा सर्वाधिक पाऊस पाटण तालुक्यातील पाथरपुंजला की वाई तालुक्यातील जोर येथे होणार हे आतातरी सांगणे शक्य होणार नाही. जुलैच्या अखेरच्या सप्ताहात जोर येथे सर्वाधिक पावसाची नोंद होती. आजमितीला मात्र, जोरला मागे टाकत पाथरपुंजला उच्चांकी ५,४४० मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. तर, जोर येथे ५,४०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोयना धरणात आजवर धरण क्षमतेच्या ९४.१४ टक्के (९९.०९ टीएमसी) पाण्याची आवक होताना, वीजनिर्मितीसाठी सुमारे १० टीएमसी पाणी वापरात येऊन त्याचा धरणातून विसर्ग झाला आहे.  कोयना धरणाच्या पाणलोटात एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जवळपास ८७ टक्के पाऊस कोसळला आहे.सध्या धरणाच्या दरवाजातून व पायथा वीजगृहातून एकूण २१,५१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यंदाही पावसाचा लहारीपणा दिसून आला आहे. जून महिन्यात अत्यल्प पाऊस होताना, जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात सलग जोरदार पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जलचित्रच पालटून गेले. तळाशी असलेले जलसाठे समाधानकारक वधारताना खरीप हंगामाला पोषक पाऊस झाल्याने बळिराजाही आनंदला गेला आहे. दरम्यान, गेल्या ८-१० दिवसांतील जोरदार व दमदार पावसाने धरणसाठे काठोकाठ भरताना, बहुतेक धरणांमधून जलविसर्ग होताना नद्या दुथडी भरून वाहिल्या.  एकूणच आजवरचा पाऊस सर्वसामान्यांना व शेतकरी वर्गाला सुखावणारा ठरला आहे. परंतु, पावसाळय़ाचा उत्तरार्ध बाकी असून, त्यात वरुणराजाची काय कृपा राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.