सोलापूर शहर व जिल्ह्यात करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विशेषतः मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी जलद चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जलद चाचण्यांची उपलब्धता अत्यल्प असताना गेल्या अकरा दिवसांत करोनाशी संबंधित १५ हजार ९४० चाचण्या करण्यात आल्या. त्यात २३४४ नवीन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील रूग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. आज अखेर रूग्णसंख्या सहा हजारांचा टप्पा ओलांडून ६ हजार १२९ झाली आहे, तर मृत्युंची संख्या ३७७ वर पोहोचली आहे. दुसरीकडे करोनामुक्त होण्याचे प्रमाण ४५.८४ टक्के झाले आहे.

११ ते २१ जुलैपर्यंत सोलापूर शहरात ५ हजार ५१५ चाचण्या होऊन त्यात ९१३ नवीन बाधित रूग्ण आढळले. यात ३३ मृतांचा समावेश आहे. १० जुलै रोजी शहरातील रूग्णसंख्या ३ हजार ७५ होती. तर मृतांची संख्या २९६ होती. आजअखेर रूग्णसंख्या ९१३ ने वाढून ३ हजार ९८८ तर मृतांची संख्याही ३३ ने वाढून ३२९ वर पोहोचली आहे. दररोज सरासरी ८३ रूग्णांची भर पडल्याचे दिसून येते. दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमधील बाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या अकरा दिवसांत ग्रामीण भागात दहा हजार ४२५ चाचण्या घेण्यात आल्या असता, त्यात १ हजार ४३१ नवीन बाधित रूग्णांची भर पडली. तर १६ मृतांची संख्याही वाढली. दररोज सरासरी २१३ रूग्ण वाढल्यामुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त होत आहे.

आज शहरात १५३ आणि ग्रामीणमध्ये १४७ असे मिळून ३०० बाधित रूग्ण सापडले. त्यासाठी २ हजार ६१६ चाचण्या कराव्या लागल्या. दिवसभरात पाच जणांचा बळी गेला. जिल्ह्यात सर्वाधिक ५१४ रूग्णसंख्या  बार्शीतील आहे. दक्षिण सोलापूर-४५४, अक्कलकोट-३७५, पंढरपूर-१९७, उत्तर सोलापूर-१७१, मोहोळ-१५७, माळशिरस-९३ याप्रमाणे विविध तालुक्यांमध्ये बाधित रूग्णसंख्या वाढत गेली आहे.

सोलापूर शहरात मृत्युचे प्रमाण ८.२४ टक्के असल्यामुळे प्रशासनाला मृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करावे लागणार असल्याचे दिसते. करोनामुक्त होण्याचे प्रमाण तुलनेत जास्त म्हणजे ५४.९३ टक्के आहे. ही जमेची बाजू मानली जाते. तर जिल्हा ग्रामीणमधील करोनामुक्त होण्याचे प्रमाण २८.९१ टक्के एवढेच आहे. शहर व ग्रामीण मिळून एकूण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ४५.८४ टक्के आहे. तर मृत्युचे प्रमाण ६.१५ टक्के आहे