मनमाड – गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने एका वाहनात त्रासदायक अवस्थेत घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. जखडलेल्या अवस्थेतील पाच गायी आणि सहा गोऱ्हे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – “मी बरंच सहन केलंय, शरद पवार…”, ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांची सूचक प्रतिक्रिया!
याबाबत पोलीस कर्मचारी सचिन पवार यांनी तक्रार दिली. पहाटे साडेचार वाजता याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या गस्ती पथकाने मनमाड-चांदवड रस्त्यावर धाव घेतली. त्यावेळी मालवाहू वाहन शिंगवे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात दिसले. या वाहनात पाच गायी व सहा गोऱ्हे जखडलेल्या अवस्थेत दिसल्याने पोलीस आणि स्थानिकांनी जनावरांना सुरक्षित बाहेर काढले. चालक शेख अजीज शेख बशीर ( २६, कुसंबा रस्ता, मालेगाव) याच्याकडे गोवंशाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.