शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके पाठवले जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ते बुलढण्यात ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात उपस्थितीतांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून सचिन वाझे हे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी रुपये पाठवत होते, असं जाधव म्हणाले.

प्रतापराव जाधवांच्या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. सचिन वाझे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते, हे कागदोपत्री स्पष्ट झालं आहे, असं आशिष शेलार म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेलारांनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा- ठाकरेंच्या घरातील सुंदर व्यक्तीमुळे एकाचा खून झाला? निलेश राणेंचं खळबळजनक ट्वीट

प्रतापराव जाधवांनी केलेल्या आरोपांवर भाष्य करताना आशिष शेलार म्हणाले, “सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते, हे स्पष्ट झालं आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे. सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात जेव्हा घेण्यात आलं, त्यावेळी कुणी दबाव टाकला होता? कुणी विशेष प्रयत्न केले होते? हेही न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. दोन्ही गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडल्या असून यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात दिसतोय. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे पाहता प्रतापराव जाधवांनी दिलेल्या माहितीला बळ मिळतंय, अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंवरील आरोपांवरून प्रतापराव जाधवांचे घुमजाव; स्पष्टीकरण देत म्हणाले…

प्रतापराव जाधव नेमकं काय म्हणाले होते?
नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून हजर झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाला शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी भेट दिली. या कार्यक्रमात बोलताना जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. “अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता तुरुंगात आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते”, असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला होता.