Sanjay Raut on Raj and Uddhav Thackeray : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार) बहुमताहून अधिक जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी महायुतीला तब्बल २३५ जागा मिळाल्या आहेत. तर, विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मविआमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (शरद पवार) १० जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, १२८ जागा लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात एकही जागा जिंकू शकली नाही. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचा एकेक आमदार निवडून आला होता. यावेळी त्यांचा विद्यमान आमदारही पराभूत झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील संयुक्त शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केवळ १३ आमदार राहिले होते. दरम्यान, या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचं मोठं नुकसान झालं आहे.

अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे २० आमदार आहेत. तर राज ठाकरेंचं विधानसभेत प्रतिनिधित्व नाही. यामुळे दोन्ही ठाकरेंच्या पक्षांना पुन्हा उभारी घ्यावी लागेल. ही उभारी घेण्यासाठी राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मराठी माणसांचे प्रश्न, मराठी अस्मिता हा या दोन्ही पक्षांचा मूळ अजेंडा आहे. मराठी माणसासाठी त्यांना एकत्र यावं लागेल असं दोन्ही पक्ष व नेत्यांच्या हितचिंतकांचं मत आहे. त्यामुळे आता विधानसभेतील पराभवानंतर हे दोन भाऊ व त्यांचे पक्ष एकत्र येतील का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, यावर शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा >> Shivsena : “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात, लवकरच..”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचं वक्तव्य

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील का? त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची व हितचिंतकांची इच्छा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, हा फक्त राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापुरता मर्यादित प्रश्न नाही. ज्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकाने एकत्र आलंच पाहिजे. मग ते प्रकाश आंबेडकर असले तरी त्यांनी देखील एकत्र यायला हवं. आंबेडकर मराठी नाहीत का? ते महाराष्ट्राचं काही देणं लागत नाहीत का? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान होतं. महाराष्ट्रातला मराठी माणूस एक राहिला पाहिजे ही त्यांची देखील भावना होती. मराठी माणूस एकत्र राहिला नाही तर महाराष्ट्र व मुंबई हमालांची व पाटीवाल्यांची होईल असा आंबेडकर यांनी इशारा दिला होता आणि आज नेमकं तेच होतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक राजकीय पक्ष व त्या पक्षाच्या नेत्याचं, लहानमोठ्या कार्यकर्त्याचं, महाराष्ट्रासाठी व मुंबईसाठी योगदान असलंच पाहिजे. मग तो नेता भाजपात, शिंदे गटात किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असला तरी त्यांनी देखील महाराष्ट्रासाठी योगदान द्यायलाच हवं. महाराष्ट्राची ही अवस्था पाहून ज्याच्या काळजाला घरघर लागली असेल ते सगळे एकत्र येतील. मुंबई व महाराष्ट्रासाठी एकत्र येतील.