Sanjay Raut महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विषय चर्चेत आहे. हा विषय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत संजय राऊत यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणारच हे दोघंही भाऊ आहेत योग्य वेळी निर्णय घेतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होतील. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यामागे कोणत्या अडचणी किंवा अडथळे असतील असं मला वाटतं नाही, किंवा असतील तर त्या इतक्या मोठ्या नाहीत की त्यांचा बाऊ करावा. मराठी माणसाच्या मनात आहे की, उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, त्यामध्ये अडचण किंवा अडसर असा काही आहे असं मला वाटत नाहीये. मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो, नेते म्हणूनही ओळखतो आणि एक कौटुंबिक मित्र म्हणूनही मी त्यांना ओळखतो. त्यांचं मन अत्यंत साफ आहे. याबाबतीत आणि प्रत्येक बाबतीत ते स्पष्ट आणि पारदर्शक आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी या विषयावर कधी नकारात्मक भूमिका घेतली नाही. किंबहुना त्यांना भेटायला येणाऱ्या पक्षातील प्रत्येक प्रमुख नेत्यांना ते याबाबतीत बोलतात. तेव्हा ते या बाबतीत इतरांची मते समजून घेतात, त्यांचे विचार जाणून घेतात. ते विषय काढतात आणि त्यांचा मते समजून घेतात. कोणी काही मत मांडलं तरी ते नकारात्मक असं स्वतःचं मत त्यावर मांडत नाहीत. हे मी अनेकदा पाहिलं आहे. त्याचबरोबर राज्यातील मराठी माणसांची मते राज ठाकरे यांना ज्ञात आहेत, त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येण्यात काही अडचणी आहेत, असं मला वाटतं नाही. असंही राऊत यांनी म्हटलं आहे. माझा कट्टा या कार्यक्रमात संजय राऊत यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
भाजपावर जोरदार टीका
राज आणि उद्धव हे दोघे एकत्र येतील आणि वीज चमकल्यासारखं राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल. ज्यादिवशी वीज चमकेल त्यादिवशी महाराष्ट्राचे राजकारण बदलून जाईल. त्यामुळे दोन्ही भावांची ताकद राहिली नाही असं म्हणणाऱ्यांना ताकद दिसून येईल, असं संजय राऊत म्हणाले. राज आणि उद्धव एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही असं भाजपकडून म्हटलं जात आहे, त्यांना संजय राऊत यांनी उत्तर दिलं.