कराड : गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शन अन् मनोभावे पूजेला आम्ही जातो. त्यात गैर काय? मूर्खांच्या वक्तव्याला अर्थ असतो का? असे संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर देत शिवसेना नेते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट बोलले. आम्ही तिथे रेड्याचा बळी दिल्याचे वगैरे कोणी म्हणत असेल तर रेड्याची शिंगं आम्ही जपून ठेवलीत, वेळ येऊ द्यात, ती कोणाच्या पोटात टाकायची ते बघू, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार डॉ. अतुल भोसले तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रासाठी आदर्श असून, आयुष्यात आपल्याकडून काही चुका घडल्या असल्यास त्याची माफी आणि भविष्याची वाटचाल चांगली होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आल्याचे शिरसाट यांनी सांगितले. घोडबंदर ते भाईंदर उन्नत मार्गात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने कोट्यवधींचा घोटाळा केल्याच्या आदित्य ठाकरेंच्या आरोपासंदर्भात शिरसाट म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी गेली २५ वर्षे मुंबईची वाट लावली. हे लोक निविदा, टक्केवारीतून बाहेर पडायला तयार नाहीत. चांगलं काम करण्यासाठी आमचा आग्रह असतो. त्यानुसार आम्ही काम करतो. आरोप करणाऱ्याला कामातूनच उत्तर देणे हा एकनाथ शिंदेंचा स्वभाव आहे. आम्ही कामातून उत्तर देऊ, त्यांच्या मागणीकडे आम्ही लक्ष देत नसल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
हिंदी मुंबईची बोलीभाषा बनल्याच्या राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानावर शिरसाट म्हणाले, मराठी भाषेचा आम्हाला अभिमान, स्वाभिमान आहे. प्रताप सरनाईक यांच्या भागात ७५ टक्के हिंदी भाषक असल्याने तसे ते बोललेत. मुंबई ही मराठी माणसांचीच असून, मराठी आपली मातृभाषा असल्याचे शिरसाट म्हणाले.
शिवसेना बोली भाषेवरून दुटप्पी भूमिका घेते का? या प्रश्नावर, शिरसाट यांनी असे काही नसल्याचा निर्वाळा देत मुंबईत येणारा परप्रांतीय असो किंवा अन्य कोणीही त्याला मराठी बोलावीच लागेल असे ठामपणे सांगितले. मात्र, काहीजण निवडणुका आल्यावर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची वल्गना करतात असा टोला त्यांनी लगावला.
विधान परिषदेचे माजी सभापती अंबादास दानवे यांनी विट्स हॉटेलमध्ये आपल्या मुलाचे पाच भागीदार कोण? हे जाहीर करण्याचे आव्हान दिले असल्याकडे लक्ष वेधले असता उद्या यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.