सातारा : जिल्ह्यात अडीच वर्षांनंतर करोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी दोन रुग्ण निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालय आणि कराडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील एकास जीवरक्षक यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात २०२० मध्ये करोनाचा प्रथम शिरकाव झाला. त्यानंतर दोन वर्षे करोनाने दोन लाखांहून अधिक जण बाधित झाले होते. तसेच अनेकांचा मृत्यूही झालेला. मात्र, २०२२ च्या उत्तरार्धापासून करोना रुग्ण सापडणे थांबले होते. पण, अडीच वर्षांनंतर पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या दोन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. एकावर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या व्यक्तीवर कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे.
घाबरून जाऊ नये – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे करोना वाढत आहे त्याप्रमाणे जिल्ह्यात सध्या करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात आणि कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती ठीक आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.
सातारा येथील उपचारासाठी दाखल असलेली महिला सत्तर वर्षांची आहे आणि त्यांना त्रास झाल्यानंतर शेवटच्या स्तरावर आजार असताना रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण चाळीस वर्षांचा पुरुष आहे. त्याची प्रकृती ठीक आहे. त्यास इतर कोणताही त्रास नाही, असे डॉ. करपे यांनी सांगितले.
या आजाराची वेगळी अशी काही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकणी अशी लक्षणे आहेत. जिल्हा रुग्णालयातील सध्याच्या डॉक्टरांनी करोनामध्ये काम केलेले आहे. करोना एक आणि करोना दोनचा डॉक्टरांना अनुभव आहे. नागरिकांनी लसीकरण केलेले असल्यामुळे नागरिकांमधली प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. जिल्हा रुग्णालयात व इतरत्रही करोनाविरोधात लढण्यासाठी सर्व तयारी केलेली आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि इतर व्यवस्था केलेली आहे. सर्व औषधे उपलब्ध आहेत. सातारा जिल्हा रुग्णालयात वीस खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. तिथे सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. करोनामध्ये आपण ज्याप्रमाणे काळजी घेत होतो. त्याप्रमाणे गर्दीत चालणे टाळावे. मुखपट्टी (मास्क) वापरावी, साबणाने हात स्वच्छ धुवावेत आदी निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी या आजाराला घाबरून जाऊ नये. करोनामध्ये घेत होतो तशी काळजी व खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांनी केले आहे.