कराड : कोयना धरण पाणलोटात जोरदार जागी आता दमदार पाऊस कोसळत असून, पश्चिम घाटक्षेत्रात अन्यत्र पावसाच्या हलक्या सरी कोसळणे कायम आहे. सध्या खरीप पेरण्यांसाठी पावसाची उसंत अन् सूर्यप्रकाश गरजेचा राहिला आहे. त्यामुळे बळीराजा आता पावसाची विश्रांती आणि सूर्यप्रकाशासाठी आभाळाकडे डोळे लावून आहे.
कोयना धरणातील पाण्याची आवक तीन दिवसांत प्रतिसेकंद ४० हजार घनफुटांवरून (क्युसेक) १६,४९७ घनफुटांपर्यंत घाटली आहे. कोयना शिवसागरात शनिवारी (दि. २२) सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांत धरणात १.४२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची आवक होवून सकल जलसाठा ३७ अब्ज घनफूट (धरण क्षमतेच्या ३५.१५ टक्के) झाला आहे. कोयना पाणलोटात दिवसभरात सरासरी १४ मिमी (एकूण ९४२) पाऊस झाला आहे. त्यात कोयनानगरला १७ मिमी (एकूण ८३९), नवजाला १० मिमी (एकूण ८६२), महाबळेश्वरला १५ मिमी (एकूण ८२५) पावसाची नोंद राहिली आहे.
पावसाची उसंत, सूर्यप्रकाश गरजेचा
मान्सूनपूर्व तुफान पावसाने शेत- शिवारात चिखल झाला असताना, मोसमी पाऊसही जोरदार कोसळल्याने जमिनीत प्रमाणापेक्षा ज्यादाचा ओलावा आहे. त्यामुळे खरिपाचा पेरा खोळंबला आहे. तरी खरीप पेऱ्याला बळ मिळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्यासाठी पावसाची उसंत अन् लख्ख सूर्यप्रकाश गरजेचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यासह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.