महाराष्ट्र विधानसभा २०१९ ची निवडणूक चर्चेचा विषय ठरली. कुणालाही कल्पना नसताना राज्यात अनाकलनीय सत्ताबदल झाला. भाजपाचं पारडं जड होतंय न् होतंय तोवर बाजी अशी काय पलटली, त्याची नोंद इतिहास नक्कीच घेईल. या बदलाचं कारण ठरलेल्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. काय घडलं होतं आजच्या दिवशी? जाणून घ्या… १८ ऑक्टोबर २०१९ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात निवडणूक प्रचाराची सांगता सभा घेतली होती. ह्याच सभेने संपूर्ण राजकारणात मोठा बदल घडवून आणला होता. कारण, पावसात भिजत शरद पवार यांनी सभा घेतली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरणच बदलून गेलं होतं. पवारांच्या या ऐतिहासिक सभेला आज बरोबर दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्याविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहे. या सभेच्या आठवणी जाग्या करत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. ते म्हणतात, आदरणीय शरद पवार साहेब, साताऱ्यातील तुमची ही सभा जिद्दीने लढण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणण्यासाठी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील! तर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या ऐतिहासिक सभेच्या आठवणी शेअर केल्या आहेत. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आव्हाड म्हणतात, भर पावसात सभा घेऊन ८० वर्षाच्या योद्ध्याने वातावरण फिरवलं होत,होय आमच्या साहेबांनी १०६ जणांना घरी बसवलं होतं..! साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपासोबत गेल्याने साताऱ्याची जागा राखणे हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेचं बनलं होतं. फक्त साताराच नव्हे तर राज्यभरातून अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यामुळे पक्ष कमकुवत होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शरद पवारांनी भर पावसातली ही सभा घेत अनपेक्षित इतिहास घ़डवून आणला.