मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार अस्तित्वात येऊन महिना उलटून गेला आहे. मात्र, अद्याप या दोघांव्यतिरिक्त एकाही मंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकरला लक्ष्य केलं असतानाच दुसरीकडे संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाने आपणच शिवसेना असल्याचा दावा करत पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर देखील पोहोचला असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष्य करतानाच शिवसैनिकांना उद्देशून चोख प्रत्युत्तर देण्याचं आवाहन केलं आहे.

मूळ शिवसेना कोणती आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाकडे राहणार? यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय झाल्याशिवाय कोणताही ठोस निर्णय घेतला जाऊ नये, असे निर्देश शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. आता उद्धव ठाकरेंनी त्याबाबत मातोश्रीबाहेर बोलताना शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

“..तर त्यांना दाखवून द्या”

“शिवसैनिकाचं रक्त असणारं आपलं मनगट आहे. तुमच्या हातातून भगवा खेचणं दूरच, पण भगव्याला हात लावण्याचा जरी कुणी प्रयत्न केला, तरी त्याला दाखवून द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

ठोस निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला न्यायालयाची तूर्त मनाई 

नाशिकमध्ये शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचं यावेळी कौतुक केलं. “नाशिकमध्ये किमान सदस्यसंख्या एक लाखाच्या वर गेली पाहिजे. कारण माझा भरवसा तुमच्यावर आहे. माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरं कुणी नाही. त्यांच्या यंत्रणा काम करत आहेत. मी कुणालाही कमी लेखत नाही. आपल्याला मर्दासारखंच जिंकलं पाहिजे. आपली सदस्यसंख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे, की भविष्यात कुणी शिवसेनेच्या नादी लागण्याचा स्वप्नातही विचार करता कामा नये”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला सगळ्यांना वेळ आल्यावर चांगली जबाबदारी देणार. पण आत्ता शिवसेनेचा भगवा हातात घट्ट पकडा. मला तुमची अशी-तशी साथ नको आहे. निवडणूक आयोग मला सदस्यसंख्या, प्रतिज्ञापत्रांविषयी विचारणा करेल. ते करतील, त्याच्या दसपटीने सदस्यसंख्या मला हवी आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.